The Biography Of Lalbahdurshastri|लालबहादुर शास्त्री यांचा जीवनप्रवास

The Biography Of Lalbahdurshastri|लालबहादुर शास्त्री यांचा जीवनप्रवास

लालबहादूर शास्त्री यांचा जन्म

तो काळ ब्रिटिश आमदानीचा. आपल्या देशावर परकीय ब्रिटिश लोकांचे राज्य होते. ते म्हणतील तसेच आपणास राहावे लागत होते. अशा त्या काळात २ ऑक्टोबर १९०४ साली लालबहादूर शास्त्रीचा जन्म एका गरीब कुटुंबात, उत्तर प्रदेशातील मोगलसराई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदाप्रसाद. ते अलाहाबाद येथे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव रामदुलारीदेवी. त्या होत्या मोगलसराई येथे शिक्षक असलेल्या हजारीलाल यांच्या कन्या. लालबदूराचा जन्म आजोळी म्हणजे मोगलसराई येथे झाला होता. त्यांना एक मोठी व एक लहान बहीण होती. त्यांचे पूर्वज बनारस जिल्यातील रामनगर संस्थानाला नोकरीला होते. तिथे त्यांचे एक लहानसे घर होते. त्यांच्या घराण्यातील लोक लहान- सहान नोकऱ्या करून उदरनिर्वाह करीत असत.

वडिलांचा आधार नाहीसा झाला

लालबहादूर दिड वर्षाचे झाले. हसू-खेळू लागले. तोच त्यांचे वडील शारदाप्रसाद प्लेगच्या साथीत मरण पावले. वडिलांचे छत हरपले. लालबहादूरांचे ते काही कळण्याचे किंवा समजण्याचे वय नव्हते. सर्वजण पोरके झाले. शारदाप्रसादांनी मागे काहीच ठेवले नव्हते. घरातला कर्तापुरुष गेला. आधार नाहीसा झाला. रामदुलारीदेवी मोठ्या कठीण प्रसंगात सापडल्या. रामदुलारीदेवी यांचे वडील हजारीलाल यांनी आपल्या मुलीला नातवंडांसह आपल्या घरी नेले. वडिलांनी आधार दिला आणि रामदुलारीदेवीवरील संकट काही काळ तरी टळले होते. हे संकट टळले,परंतु पुन्हा दुर्दैव आड आले. दोन वर्षांनी हजारीलाल देवाघरी गेले.

रामदुलारीवर पुन्हा जणू आभाळ कोसळले.त्यांचा मायेचा आधार तुटला, पण पुन्हा दैवच मदतीला धावून आले. रामदुलारीदेवींचे चुलते दरबारीलाल, त्यांच्या मदतीला धावून आले. ते हजारीलाल प्रमाणेच मनाने प्रेमळ व कनवाळू होते. ते सरकारी खात्यात गाझीपूर येथे कामाला होते. त्यांचा मुलगा बिंदेश्वरी प्रसाद हा मोगलसराई येथे शिक्षक होता. त्यांच्याकडे रामदुलारीदेवी मुलांसह राहू लागल्या. त्यांचे चुलते दरबारीलाल त्यांना नेमाने खर्चासाठी पैसे पाठवून देत असत. लालबहादूर त्यावेळी अवघे तीन वर्षाचे होते. आपण कोणत्या संकटात आहोत, हे त्या लहानग्याला कसे समजणार? बिंदेश्वरी प्रसाद हेही स्वभावाने प्रेमळ होते. लालबहादूर सर्वांचे लाडके बनले होते. त्याच घरी लालबहादुरांचा सख्खा मामाही रहात होता. तो होता सात वर्षाचा . त्याचे नाव पुरुषोत्तमलाल मग काय? मामा-भाच्याची चांगलीच गट्टी जमली. हसण्या-खेळण्यात त्यांचा दिवस जाऊ लागला.

तेथे मौलवीच्या हाताखाली मुलांना शिक्षणाचे प्राथमिक धडे देण्याचा, त्या घरात रिवाज होता. म्हणून मुलांना प्रथम उर्दू शिकावे लागे. दीक्षा देण्याचा समारंभ होत असे. लालबहादूरांनाही अशी शिक्षा दिली. मौलवीच्या हाताखाली ते उर्दू आणि सामाजिक शिष्टाचार, याचे शिक्षण घेऊ लागले. बारा वर्षाचे होईपर्यंत लालबहादूर मोगलसराई ला मामांकडेच राहत होते.

मी काय करायला हवे?

असे दिवस चालले असताना लालबहादूरांवर पुन्हा एकदा आपला बाड -बिस्तर उचलण्याची वेळ आली. त्यांच्या मामांची मिर्झापूरला बदली झाली. सर्व लोक तिकडे गेले. परंतु लालबहादूरांना पुढील शिक्षणासाठी बनारसला जावे लागले.

रामदुलारीदेवी मुलांना घेऊन बनारसला आल्या. दूरच्या नात्यातला त्यांचा पुतण्या बनारस येथे नोकरीला होता. त्यांनी मोठ्या आंनदाने या कुटुंबाचे पालन-पोषण करण्याची जबाबदारी उचलली. सर्वजण त्यांच्याकडे राहू लागले. लालबहादुरानी हरिश्चंद्र हायस्कूल मध्ये सातवीत प्रवेश घेतला. ते १९१७ साल होते. बनारस हे पूर्वीपासून एक पुण्यक्षेत्र मानले जात होते. लालबहादुर शाळेत एक सद्वर्तनी आणि हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्या शाळेत मिश्रा नावाचे एक गुणग्राहक शिक्षक होते. त्यांनी लालबहादूरांच्या अंगाचे गुण पारखले. मिश्रा गुरुजी, आपल्या देशाची उच्च सांस्कृतिक परंपरा मुलांना पटवून सांगत. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या शूर कथा ते मुलांना ऐकवत. स्वातंत्र्य आंदोलनाची माहिती ते मुलांना द्यायचे. आपणही स्वातंत्र्य आंदोलनात भाग घ्यावा, असे लालबहादूरांना वाटत होते. भारतात घडणाऱ्या घटना, त्याची माहिती ते वाचू लागले. त्यांनी काँग्रेसबद्दलही माहिती करून घेतली. स्वामी दयानंद , विवेकानंद यांची पुस्तके त्यांनी वाचून काढली.

त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटू लागली. आपणही आपल्या मायभूमीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घ्यायला हवा, असे लालबहादूरांना वाटू लागले. त्याचवेळी गांधीजींचे विचारही त्याच्या कानावर पडत होते.जालियनवाला बाग येथे इंग्रजांनी केलेल्या हत्याकांडाने,त्यांना खूप दुःख झाले. त्यांचे मन पेटून उठले. लालबहादूर तेंव्हा दहावीत होते. लालबहादुरानी आधी आपले शिक्षण पूर्ण करावे. मग कसलीतरी नोकरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा, असे त्यांच्या घरातील लोकांचे म्हणणे होते. ते नोकरी करू लागले म्हणजे घरातील गरिबी थोडीतरी दूर होईल, अशी त्यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा होती. कोणालाही असेच वाटले असते, परंतु घडणार काही वेगळेच होते.

स्वातंत्र्य चळवळीचे शिलेदार

एकदा गांधीजींचे बनारसला मोठी सभा भरली. अलगू राय, त्रिभुवन नारायण सिंग या आपल्या मित्रांबरोबर लालबहादूर या सभेला हजर होते. लालबहादूर लक्षपूर्वक गांधीजींचे भाषण ऐकत होते. “तरुणांनी सरकारी शाळेवर बहिष्कार घालावा. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेत शिकावे आणि स्वातंत्र चळवळीत भाग घ्यावा. भारतमातेला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, देशाला तुमची गरज आहे. ते तुमचे कर्तव्य आहे’ असे गांधीजींनी तरुणांना आवाहन केले. भाषण ऐकून लालबहादूर घरी आले. काय करावे, हे त्यांना समजत नव्हते. ते सरकारी शाळेत शिकत होते. आपल्या घरातील माणसांना आपला विचार बोलून दाखवीत ते म्हणाले,’ मला देशसेवा करायची आहे’

त्याकाळी हातात नुसता देशाचा झेंडा घेऊन फिरले तरी इंग्रज शिपाई लाठीने डोकी फोडीत आणि खडी फोडायला तुरुंगात पाठवीत. त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. त्यांना तुरुंगाची वारी घडली, पण स्वातंत्र्य आंदोलनातील ते एक शिलेदार झाले. गांधीजींच्या आदेशानुसार जे.बी. कृपलानी यांनी सरकारी नोकरी सोडून खादीचा प्रसार करण्यासाठी आश्रम काढला. लालबहादूर व त्यांचे मित्र त्यांना मदत करू लागले. खादीची विक्री करू लागले.तेथे एक राष्ट्रीय शाळाही त्यांनी सुरू केली होती. या शाळेत नेहमीच्या शिक्षणाबरोबर राष्ठ्र प्रेम आणि देशभक्ती याचेही शिक्षण दिले जात होते. तेथेच लालबहादुरानी गॅरी बाल्डी, डी. व्हेलेरा मॅझिनी या स्वातंत्र्यवीरांची चरित्रे वाचून काढली. गांधीजींच्या प्रेरणेने बनारस येथे काशी विद्यपीठाची स्थापना झाली. हिंदी माध्यमातून शिक्षण देणारे ते देशातील पहिलेच विद्यापीठ ठरले. तेथे बोलताना गांधीजी म्हणाले,” हे विद्यापीठ असहकाराच्या चळवळीचे प्रतीक आहे. येथे राष्ट्रीय शिक्षण दिले जाईल. मुलांनी या राष्ट्रीय विद्यापीठात प्रवेश घेऊन, राष्ट्रकार्याला हातभार लावावा. लालबहादूर आणि त्यांच्या मित्रांनी या विद्यपीठात प्रवेश घेतला.परीक्षा घेऊन तेथे चार वर्षाच्या अभयसक्रमासाठी प्रवेश देण्यात येऊ लागला. अशाप्रकारे लालबहादूर स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले.

The Biography Of Lalbahdurshastri|लालबहादुर शास्त्री यांचा जीवनप्रवास

समाजकार्याचा वसा

`मौजमजा करण्याच्या वयात लालबहादुरानी देशभक्तीचा, देशसेवेचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांच्या मनात देशसेवेचे स्फुलिंग प्रखरतेने पेटले होते. काशी विद्यापीठात नामवंत, विद्वान, प्राध्यापक मंडळी देशभक्तीचे, संस्कृतीचे, तत्वज्ञानाचे धडे देत होती. लालबहादूर मन लावून अभ्यास करू लागले. नेहमीच्या अभ्यासाबरोबर ते हिंदी, इंग्रजी आणि उर्दू साहित्याचाही अभ्यास करू लागले. या काळात त्यांनी आपल्या गरजा फारच मर्यादित ठेवल्या. त्यांनी मनापासून स्वतःला चांगल्या सवयी लावून घेतल्या. आपल्या गरिबीचे त्यांनी कधी भांडवल केले नाही की. गरिबीबद्दल त्यांना कधी दुःख झाले नाही. लालबहादूर काशी विद्यापीठात रमू लागले. वाद-विवाद, चर्चा यामध्ये ते रंगत असत. मोजक्या, सोप्या शब्दात ते आपलीही मते मांडीत असत. दुसऱ्याचे म्हणणे ते ऐकत असत. आपणच फार शहाणे म्हणून मिरवण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. लाल बहादूर मित्रांच्या कोंडाळ्यात हास्य-विनोदही करीत असत.पण कोणाचे मन दुखावले जाईल, असे ते वागत नसत. त्यांचे कपडे मोजके आणि नेहमी स्वच्छ असत. त्यांना संगीताचीही आवड होती.
गरिबीतही समाधानी वृत्ती असलेले लालबहादूर देशसेवेबरोबरच आपले शिक्षणही पुरे करीत होते. पुढे ते पदवी अभ्यासक्रम पहिल्या वर्गात पास झाले. त्यांनी शास्त्री हि पदवी मिळवली. हि पदवीच त्यांचे कायमचे आडनाव होऊन बसली. लालबहादूर आता ध्येयवादी तरुण बनले. काँग्रेसचे स्वयंसेवक बनून देशकार्यासाठी सज्ज झाले. लाहोरला लालालाजपत रॉय यांनी ‘ द सर्व्हन्टस ऑफ द पीपल सोसायटी’ स्थापना केली होती. संपूर्ण राष्ट्रकार्याला वाहून घेणारे मिशनरी वृत्तीचे स्वयंसेवक
निर्माण करण्याचे काम हि सोसायटी करीत होती. अल्प वेतनात सेवा आणि त्याग या भावनेने कार्य करीत इतरांपुढे आदर्श निर्माण करण्याचे या सोसायटीचे ध्येय होते. या सोसायटीत लालबहादूर दाखल झाले. लालबहादुरशास्त्रींना सर्वजण शास्त्री असे म्हणू लागले होते. शास्त्रींचा पिंड सेवावृत्ती, निस्वार्थीपणा,कष्टाळूपणा आणि विनम्रतेचा होता. म्हणून त्यांना अशी कठीण जबाबदारी पेलता आली. अत्यंत तुटपुंज्या मिळकतीच्या आधारावर गरीबांमध्ये राहून महिला आणि बालक यांच्या कल्याणासाठी शास्त्री रात्रंदिवस कष्टत होते. खूप हाल- अपेष्टा भोगून ते सामाजिक कार्य करीत होते. आयुष्यात प्रथमच ते थोडीफार कमाई करू लागले.त्यांनी पहिला पगार आपले पालन-पोषण करणारे रघूनाथ प्रसाद यांना पाठवून दिला. शास्त्रींनी आपली पहिली कमाई पाठवलेली पाहून त्यांचे मन भरून आले. त्यातला नाममात्र एक रुपया ठेवून, बाकी पैसे त्यांनी शास्त्रींना परत पाठवून दिला. असे नातेवाईक मिळणे म्हणजे शास्त्रीचें नशीब थोर असेच म्हणायला हवे.

पंडित नेहरूंचे मदतनीस

जनसेवेचे व्रत घेतलेले शास्त्रीजी तन-मन -धन अर्पून काम करीत होते. त्याच वेळी गांधीजींनी असहकार आंदोलन सुरु केले. या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल इंग्रज शिपायांनी लाला लजपत राय यांना लाठीने झोडपून काढले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. या घटनेने शस्त्रीजींना फार दुःख झाले. लाला लजपत राय यांच्यानंतर पुरुषोत्तमदास टंडन हे सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते कडवे देशभक्त होते. त्यांचे मदतनीस म्हणून शास्त्रीजी काम पाहू लागले.

त्याचवेळी ते तेथील लोकांच्या अडचणीही सोडवू लागले. त्यांच्या कामावर टंडन खुश असत. शास्त्री आता चोवीस वर्षाचे झाले होते. घरचे लोक त्यांच्या विवाहाचा विचार करू लागले. सीताराम नावाचे गृहस्थ शाळांचे अधिकारी म्हणून काम करीत असत. त्यांची मुलगी ललिता देवी. सीतारामानी शास्त्रीबरोबर ललितादेवींचा विवाह करण्यास मान्यता दिली. ललितादेवी त्यावेळी सतरा वर्षाच्या होत्या. शास्त्रीजींनी हुंडा घेतला नाही. हुंडा म्हणून चरख्याचा स्वीकार केला. लवकरच शास्त्रीजी ललितादेवी शुभमंगल झाले. सधन घराण्यातील असूनही ललितादेवीनी शास्त्रीजींबरोबर गरिबीत संसार करण्याचा निर्णय घेतला. पती खादी वापरतात म्हणून ललितादेवींनी , खादीच्या जाड्यभरड्या साड्या वापरण्यास सुरुवात केली.शास्त्रीजींची कामावरील निष्ठा पाहून टंडन नी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाची काही कामे सोपवायला सुरुवात केली. शास्त्रीजी गुंतागुंतीची कामे मार्गी लावू लागले. पक्षाची काम करीत असतानाच शास्तीजींचा नेहरू कुटुंबियांशी प्रथम परिचय झाला. पं. नेहरू तेंव्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. प्रेमळ स्वभावाच्या शास्त्रीजींना त्यांनी पाहिले. त्यांची सेवावृत्ती पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी शास्त्रीजींवर आपली कामे सोपवली. शास्त्रींनी अगदी व्यवस्थितपणे काम करून आपल्या कामाची चुणूक नेहरूंनाही दाखवली. नेहरू खुश झाले. शास्त्रीजींचा नेहरू घराण्याशी संबंध वाढू लागला. याचवेळी शास्त्रीजी टंडन यांच्याकडेही काम करीत असत.पक्षाच्या कामाबरोबर ते सोसायटीची कामेदेखील करायचे. पं. नेहरू आणि टंडन दोघेही पक्के राष्ट्रभक्त होते. मात्र दोघांची विचार करण्याची, काम करण्याची पद्धत थोडी वेगळी होती आणि अशा वेगळ्या विचारसरणीच्या दोन्ही व्यक्तींकडे शास्त्रीजी त्यांच्या मदतनिसाचे काम करीत होते. हि अवघड जबाबदारी ते लीलया पार पाडीत असत.

सैनिक झाले स्वातंत्र्याचे

कोणतेही शस्त्र हाती न घेता देशात स्वातंत्र्य लढा सुरु झाला होता. अनेक तरुण स्वातंत्र्य चळवळीत सामील होत होते. शास्त्रीजींनीही या स्वातंत्र्य संग्रामात स्वखुशीने उडी घेतली. त्यावेळी ते अलाहाबाद जिल्हा काँग्रेसचे चिटणीस म्हणूनही काम करीत होते. गांधीजींनी दांडीयात्रा काढून मिठाचा कायदेभंग केला,त्यामुळे गावोगावी कायदेभंगाच्या चळवळी सुरु झाल्या. त्यांनी गावोगावी इंग्रज सरकारला भाडे न देण्याची चळवळ सुरु केली. त्यामुळे इंग्रज सरकार खवळले. शास्त्रीजींना अटक होऊन अडीच वर्षाची कारावासाची शिक्षा झाली.परंतु लवकरच त्यांची सुटका झाली. त्यानंतर गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली. परदेशी मालावर जनतेने बहिष्कार घातला. शास्त्रीजींनी स्वतःला या चळवळीत झोकून दिले. शास्त्रीजींना पकडून परत तुरुंगात धाडण्यात आले. अनेक आंदोलनात त्यांनी भाग घेतला. अनेकवेळा त्यांना तुरुंगात जावे लागले. आपल्या आयुष्यातील नऊ वर्ष त्यांनी तुरुंगात काढली.

संकटाशी सामना

शास्त्रीजी तुरुंगात असताना, त्यांच्या कुटुंबालाही अनेक संकटातून जावे लागत होते. एकदा शास्त्रीजींची मोठी मुलगी खूप आजारी पडली. घरी ललितादेवी एकट्याच मुलांचा सांभाळ करीत होत्या. आजारी मुलीला भेटण्यासाठी शास्त्रीजींच्या जीवाची घालमेल झाली होत होती. मुलीला भेटायचे तर सरकारला असे लिहून द्यावे लागणार होते कि,मी यापुढे राजकीय कार्यात भाग घेणार नाही.पण शास्त्रीजींनी ते मान्य नव्हते. पण तुरुंगाधिकाऱ्याचा शास्त्रीजींवर विश्वास होता. ते मुलीला भेटून परत येतील,यांची त्याला खात्री होती. त्याने शास्त्रीजींनी १५ दिवसांच्या मुदतीवर घरी सोडले. शास्त्रीजी घरी गेले. पण त्याच दिवशी त्यांच्या मुलीने या जगाचा निरोप घेतला. क्रियाकर्म आटोपताच शास्त्रीजी तत्काळ तुरुंगात हजर झाले. शास्त्रीजी नियमाने वागणारे, संधीचा गैरफायदा न घेणारे होते.

धनाची नव्हे । प्रेमाची कमाई

दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंड हे राष्ट्र खिळखिळे झाले होते. त्यांचे साम्राज्य लयाला जाऊ लागले. भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीने त्यांच्या नाकीनऊ आले होते. हळूहळू भारतीय लोकांच्या हाती राज्यशकट सोपवावा, असे त्यांना वाटू लागले होते. त्यामुळे १९४५ साला मध्ये कैदेत ठेवलेल्या सर्व नेत्यांची सुटका झाली. त्यांच्याबरोबर शास्त्रीजीही सुटले. त्यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसचे कार्य करण्यास सुरुवात केली. आपल्या अंगच्या गुणांमुळे त्यांच्याकडे अनेक मनाची पदे चालून आली. या पदावर काम करीत असताना, त्यांना नेहमी जनतेचे कल्याण हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवले. शास्त्रीजी पहिल्यांदा उत्तर प्रदेशात मंत्री म्हणून काम करू लागले. ते नेहमी अगदी साधे आणि स्वच्छ राहत असत. मंत्री बनल्यावरही त्यांनी आपला साधेपणा सोडला नाही.

जय जवान ।जय किसान

भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून १५ ऑगस्ट १९४७ रोजी अस्तित्वात आले. पं . नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. देशाचा कारभार पाहू लागले. त्यासाठी त्यांना कर्तबगार आणि विश्वासू माणसांची गरज भासू लागली.म्हणून पं. नेहरूंनी शास्त्रीजींना दिल्लीला बोलवून घेतले. काँग्रेस पक्ष संघटनेत त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केले. त्यांनी देशभर दौरा केला. त्यांना कामाचा कंटाळा नसे. ते तासन्तास ते काम करीत असत.काही काळाने शास्त्रीजी देशाचे रेल्वेमंत्री झाले. मंत्री म्हणून काम करीत असताना त्यांनी स्वतःवर काही बंधने घालून घेतली होती. त्यामुळे सर्वांशी त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले होते.

आतापर्यंत देशात त्यांनी खूप नाव कमावले होते. अनेक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. नेपाळ या शेजारी राष्ट्रांशी मित्रत्वाचे आणि विश्वासाचे संबंध निर्माण करण्यात ते यशस्वीठरले होते. देश आणि परदेशात असे यशस्वीपणे काम करीत असता, काँग्रेस पक्षाचे काम करण्यासाठी त्यांनी मंत्रिपद सोडले होते. त्यांनी सत्तेची कधी अभिलाषा धरली नाही, परंतु सत्तापदेच त्यांच्याकडे चालून येत असत. पं. नेहरू चे निधन झाले आणि शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान बनले. सतेचा वापर देशहितासाठी आणि सामान्य जनतेसाठी करणार, जनतेचे म्हणणे एकूण घेऊन, सर्व बाजूंचा सारासार विचार करून निर्णय घेणार, असे त्यांनी ठरवले. देशाच्या सरंक्षण यंत्रणेचे आधुनिकीकरण संरक्षण सिद्धतेसाठी अनेक उपाय योजना, त्यासाठी परदेशातून मदत मिळवणे, अन्नधान्याची टंचाई दूर करणे, महागाई आटोक्यात ठेवणे अशा महत्वाच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला.शेजारी देशांशी तसेच जगातल्या इतर देशांशी मित्रत्वाचे, शांततेचे संबंध निर्माण कारण्यासाठी त्यांनी पावले उचलली. यासाठी त्यांनी जगातील अनेक देशांचा दौरा केला. भारतही शांतताप्रिय राष्ट्र आहे. पण कोणी आम्हाला कमजोर समजू नये, असेही त्यांनी सांगितले. जगातल्या अनेक देशांनी शास्त्रीजींच्या शांततामय धोरणाला पाठिंबा दिला.

भारतीय सैनिकांनी पाकिस्तानची दाणादाण उडविली. या काळात भारतीय लोकांना आणि लढणाऱ्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, देशाभिमान जागृत करण्यासाठी शास्त्रीजींनी “जय जवान , जय किसान” अशी घोषणा दिली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात रशियातील ताशकंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी शांतता करार झाला. पण शास्त्रीजींनी विजयाचे सुख लाभले नाही. त्याच रात्री ताशकंद येथे त्यांचे दुःखद निधन झाले.
विजयाच्या तेजाने तळपणारा भारतीय तारा अकस्मात अंतर्धान पावला. लालबहादूर शास्त्री “भारतरत्न” ठरले. अशा शास्तीजींना आमचे शतशः प्रणाम.

हे पण वाचा:- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन चरित्र
हे पण वाचा:- सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती