
Information Savitribai Phule|सावित्री बाई फुले यांच्या विषयी माहिती
सावित्रीबाई फुले यांचा जन्म
नायगाव या खेडेगावात नेवसे-पाटील यांच्या घरात एक बालिका जन्माला आली. आई-वडिलांनी आपल्या या मोठ्या मुलीचे नाव आवडीने ‘सावित्री’असे ठेवले. हि सावित्री म्हणजे पुढे आपल्या देशात स्त्री-शिक्षणाची क्रांती ज्योती प्रज्वलित करणाऱ्या थोर समाजसेविका,महान साध्वी अशा’सावित्रीबाई फुले’ म्हणून उदयाला आल्या. आपल्या कर्तृत्वाने,समाजसेवेने त्यांनी पुढे भारतीय जनतेच्या हृदयात मानाचे अढळ स्थान प्राप्त केले. नेवसे-पाटील गावातील एक प्रतिष्ठित गृहस्थ होते आणि गावचे पाटील म्हणून लोक त्यांच्याकडे आदराने पाहात असत. सावित्रीबाई तर पाटलांच्या कन्या म्हणून लोक त्यांच्याकडेही कौतुकाच्या भावनेने पाहात असत.सावित्रीबाई चार वर्षाच्या झाल्या,तसे त्यांना थोडे-फार कळू लागले. लहान वय असले,तरी त्या चौकस बुद्धीच्या होत्या. एखादी गोष्ट पहिली, ऐकली कि त्याबद्दल आपल्या आईला अनेक प्रश्न विचारून त्या भंडावून सोडत. लहानपणी त्या थोड्याशा खट्याळपणाही करायच्या. त्यामुळे आई मात्र वैतागून जायची.
सावित्रीबाईंचा विवाह
आला दिवस मावळत होता.तशी सावित्रीबाईंच्या आईची काळजी मात्र वाढू लागली. कधी एकदा आपल्या मुलीचे हात पिवळे होतात, याची चिंता त्यांना लागली होती. घरात त्यांच्या विवाहाचा विचार सुरु झाला होता. वडिलांनी वरसंशोधन सुरु केले होते. अखेर अनेक मुलांना पाहून झाल्यावर त्यांना एक मुलगा आवडला. पुण्यात राहणारे फुले कुटुंबीय आपले नाव आणि आदब राखून होते. ते फुलांचा व्यापार करायचे. म्हणून लोक त्यांना फुले याच नावाने ओळखू लागले होते.मुलाचे नाव होते जोती. लोक पुढे त्यांना जोतिबा या आदरार्थी नावाने ओळखू लागले. तर सावित्रीबाई आणि जोतिबाचा विवाह निश्चित झाला.अखेर लग्नाचा दिवस उजाडला. नातेवाईक,वऱ्हाडी मंडळी,गावातील पुरुष,स्त्रिया, मुलींनी मांडव गजबजून गेला.नव्या सुंदर कपड्यातले नवरा-नवरी शोभून दिसत होते.डोक्याला बाशिंग आणि मुंडावळ्या बांधल्या होत्या. आणि लग्न थाटामाटात पार पडले. जोतिबांची शाळा बंद
विवाह सोहळा थाटामाटात,आनंदात पार पडला. सावित्रीबाई जोतिबांच्या सौभाग्यवती बनून फुल्यांच्या घरात सासरी आल्या.हे घर त्यांना वेगळे वाटले नाही कि परक्यांच्या घरी आपण आलो असेही त्यांना वाटले नाही. त्या आपल्या पतींना ‘शेटजी’ अशा नावाने हाक मारायच्या.जोतिबा सतत पुस्तके वाचण्यात मग्न झालेले असायचे. त्यांचे सासरे तर फारच प्रेमळ स्वभावाचे होते. खेळण्याचे वय असल्याने सावित्रीबाई शेजार-पाजारच्या मुलींबरोबर खेळायला जायच्या. अशा वेळी सासरे त्यांना रागावत नसत. जोतिबाही शाळकरी वयाचेच होते. त्यांना जवळचे असे बरेच मित्र होते. ते सर्व शाळेत जायचे. अधे मध्ये शाळा सुटल्यावर हे मित्र जोतिबांच्या घरी यायचे. अशाच त्यांच्या गप्पा चाललेल्या असताना सावित्रीबाईंना एक गोष्ट नव्यानेच कळली. आपल्या पतीला त्याच्या वडिलांनी शाळेतून काढून घरी ठेवले कारण ते शिकून शहाणे झाले, तर आळशी होईन बागकाम, शेतीकाम जमणार नाही. मोट धरता येणार नाही. हातात खुरपे घेऊन पिकातील तण काढता येणार नाही. अशा प्रकारे जोतिबा आणि त्यांच्या मित्रांच्या गप्पा चालत. परंतु काही समंजस लोक जोतिबांची हुशारी, त्यांना असलेली शिक्षणाची आवड जाणून होते. हा मुलगा शिकल,तर नाव खूप कमावेल,असे त्यांना वाटायचे. लोकांनी जोतिबांच्या वडिलांची समजूत घातली.’तुमचा मुलगा खूप हुशार आहे,त्याला चांगले शिकवा’ असे सांगितल्यावर वडिलांनाही आपली चूक कळून आली. आपल्यामुळे जोतिबाचे नुकसान झाले,असे वाटून त्यांनी पुन्हा जोतिबांना शाळेत दाखल केले.
जोतिबा वाचत,सावित्रीबाई ऐकत
जोतिबांची शाळा पुन्हा सुरु झाली आणि घरात पुस्तकांचा पसारा वाढू लागला.इथे तिथे बरीच पुस्तके पडलेली असत.जोतिबांना वाचनाची खूपच आवड होती. त्यामुळे ते मिळेल तेथून पुस्तके,ग्रंथ घेऊन यायचे. एक दिवशी सावित्रीबाईंना वाटले,आपण घर आवरावे सर्व वस्तू जिथल्या तिथे ठेवाव्यात. पुस्तकावरील धूळ झटकुन ती व्यवस्थित रचून ठेवावीत. म्हणून त्यांनी पुस्तकांचा पसारा काढला.आणि त्यांची पाने जुळवून रचून ठेवू लागल्या.तितक्यात जोतिबा तिथे आले. आपली पत्नी पुस्तके आवरून ठेवीत आहे,असे पाहून ते म्हणाले, अग माझी पुस्तके कशाला काढलीस ‘ तेंव्हा त्या म्हणाल्या घराची साफसफाई करायला. सावित्रीबाईंनी त्यांना विचारले हि पुस्तके कसली आहेत. तेंव्हा ते म्हणाले अग हि मोठ्या कर्तृत्ववान महान माणसाची चरित्रे आहेत.दोघा पतिपत्नींत असा संवाद नेहमीच चालायचा. सावित्रीबाईंनाही असे नवे काही पाहण्यात,ऐकण्यात आंनद वाटायचा.त्या रोज एक-एक पुस्तकं पाहायच्या. त्याची पाने चाळायच्या. त्यातील चित्रे पहायच्या आपल्या पत्नीलाही पुस्तके,चित्रे पाहायला आवडतात, असे पाहून जोतिबा त्यांना एक-एक पुस्तक दाखवून ती त्यांना वाचून दाखवू लागले.पती पत्नींची आवड, आचार विचार वेगळे राहिले नाहीत.सावित्रीबाईंचे मन पुस्तकांच्या वाचनात गुरफटून गेले.
ध्येय ठरले
आवडणाऱ्या गोष्टीत वेळ कसा जातो,ते समजत नाही. आपल्या पतीच्या आचरा-विचारांनी सावित्रीबाई पुरत्या भारून गेल्या. पतीच्या वाटचालीत मनापासून साथ देऊ लागल्या. त्या काळी माणसा माणसात भेदभाव मानला जात असे. हा उच्च,तो कनिष्ठ असे म्हटले जायचे. कनिष्ठ लोकांना अपमानाची वागणूक देण्यात येत असे.एकदा जोतिबा उच्च वर्गातील आपल्या एका मित्राच्या लग्नाला गेले होते.जोतिबा कनिष्ठ वर्गातील, असे म्हणत तेथील काही लोकांनी त्यांचा अपमान केला. लग्नाच्या वरातीत त्यांना सर्वांच्या पाठीमागून चालण्यास सांगण्यात आले. ते कनिष्ठ वर्गातील म्हणून त्यानं हिणवण्यात आले.ते कनिष्ठ वर्गातील म्हणून त्यांना हिणवण्यात आले. त्यामुळे जोतिबा खूप संतापले. या गोष्टींचा त्यांना अपमान वाटला. अर्ध्यावर वरात असतानाच ते रागाने घरी आले. आमंत्रण देऊन वर अपमान करतात,याचे त्यांना फार वाईट वाटले. घरी आले, तरी त्यांचा राग गेला नव्हता. सावित्रीबाईंना आपले पती का संतापले,हे समजताच समजावणीच्या स्वरात त्या म्हणाल्या, ‘अहो असे रागावू नका.जरा समजुतीने घेतले,तर नाही का चालायचे?’.जोतिबाचे वडील घरी आले. आपला मुलगा एवढा का संतापला,हे त्यांनी जाणून घेतले आणि मग तेही जोतीबांचा राग शांत करण्याच्या उद्देशाने म्हणाले, अरे जोती,आपण कनिष्ठ वर्गातील,आपण त्यांच्या बरोबरीचे कसे होणार ?’ ‘का नाही होणार?’ जोतिबानी विचारले,आपणही माणसेच आहोत ना?’जोतिबा म्हणाले,’नाही, मी हे सहन करणार नाही. माणसा माणसात जातीवरून भेदाभेद माजवणे, उच्च नीच ठरविणे हे मला मानवणारे नाही. स्वार्थापोटीच हे सर्व चालले आहे. या उच्च वर्गातील लोकांनीच आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवले. आमचा शिक्षण घेण्याचा अधिकार नाकारला. म्हणून माझे ध्येय एकच.माणसामाणसातील भेदभाव दूर करण्यासाठी सर्वाना शिक्षण देणे, हाच त्यावरील उपाय आणि त्यासाठीच यापुढे मी जीवाचे रान करिन’. जोतिबांनी जणू प्रतिज्ञाच केली.
सावित्रीबाई शिकू लागल्या
काही माणसे ध्येयवेडी असतात,असे म्हटले जाते. ध्येय साध्य करण्यासाठी कितीही परिश्रम करण्याची,कष्ट करण्याची,अपमान सहन करण्याची त्यांच्या मनाची तयारी असते. जोतिबा आणि सावित्रीबाई असेच होते. ते एकदा अहमदनगरला आपला मित्र गोवंडे यांच्याकडे गेले होते. ते दोघे मित्र तिथल्या एका शाळेत गेले.तेथे फरार नावाच्या बाई शाळा शिकवत होत्या. हे दोघे मित्र त्यांना भेटल्यावर त्या फरार बाई म्हणाल्या,’स्त्री हा घराचा मध्य आहे. स्त्रीचे शिक्षण झाले ,तरच घराची सुधारणा होणार.तुम्ही लोक आपल्या स्त्रियांना शिकवत नाही. त्यामुळे तुमची प्रगती होत नाही. हि फारच वाईट गोष्ट आहे. तुम्ही लोकांनी मनावर घेतले,तर हे कार्य तुम्हाला करता येईल.’ फरार बाईंच्या या शब्दांनी जोतिबांच्या विचारांना आणि ध्येयाला जणू चालनाच मिळाली. शिक्षणाची गंगा बहुजन समाजाच्या दाराशी नेण्याचे त्यांनी मनोमन ठरवले. त्यासाठी परिश्रम घेण्याची त्यांच्या मनाची तयारी झाली. आपल्या पत्नीला शिकवून तयार करण्याचे त्यांनी ठरवले. घरी जातानाच ते बरोबर पाटी-पेन्सिल घेऊन गेले. त्यांनी प्रथम सावित्रीबाईंना त्यांचा आवडता शब्द शिकविला. शे-ट-जी तो त्यांना गिरवायला लावला. मग काय, मुळाक्षरापासून सुरुवात झाली. त्या रोज शिकू लागल्या,वाचू लागल्या, लिहू लागल्या, पाठ करू लागल्या.
कंटाळा जणू त्यांना माहीतच नव्हता. शिक्षणासाठी त्याही रात्रीचा दिवस करू लागल्या. जोतिबांनी आपल्या वडिलांना हि सांगितले होते कि स्त्रियांना हि शिक्षणाचा अधिकार आहे. ते आपल्या पत्नीला म्हणाले,’स्त्रियांना शिक्षण देण्याच्या कार्यात तू तरी माझी साथ देशील का?’ यावर सावित्रीबाई क्षणाचाही विलंब न करता म्हणाल्या,’होयतर|मी तुमची पत्नी आहे.तुमच्या कार्यात मी सुद्धा सहभागी होणारच.’ अशा प्रकारे जोतिबांनी आपल्या कार्यात सावित्रीबाईंना सहभागी होण्यासाठी सुचविले ,म्हणून त्यांना खूप आनंद झाला. खऱ्या अर्थाने आपण जोतिबांच्या अर्धांगिणी आहोत, याचा त्यांना अभिमान वाटला.तो दिवस त्यांच्या कायमच स्मरणात राहिला.
आधी अभ्यास,मग ध्यास
एखाद्या ध्येयाचा ध्यास घेतल्यावर माणसे कशी झपाटून काम करू लागतात,हे आपणास सावित्रीबाई आणि जोतिबा यांच्या जीवनाकडे पहिले कि दिसून येते.त्या दिवसापासून जोतिबा शांत बसले नाहीत.त्यांनी वेगवेगळ्या ग्रंथांचे वाचन सुरु केलं. हिंदू धर्माचे अनेक ग्रंथ,कबीराचे दोहे,संत शिरोमणी तुकाराम महाराजांची गाथा,ज्ञानेश्वरी,मार्टिन ल्युथरचे चरित्र, प्रो.विल्सन,सर विल्यम जोन्स यांचे लेखन त्याचबरोबर इतरधर्मीय ग्रंथांचाही अभ्यास केला.रोज ते वाचन करायचे,काय वाचले आणि ते आपल्या पत्नीला समजावून सांगायचे.याबाबत मित्रांबरोबर चर्चाही करायचे.
सावित्रीबाई शाळेत शिकवू लागल्या
एकदा मनावर घेतले की मागे हटायचे नाही,हे जोतिबा आणि सावित्रीबाईंनी पक्के ठरवले होते. जोतिबांनी भिड्यांच्या वाड्यात दलित आणि पिडलेलेया समाजातील मुलींसाठी शाळा सुरु केली आणि त्यामुळे गावात कलकल सुरु झाली. “अनीती वाढली हो।” असा गहजब सुरु झाला. कोणी म्हणू लागले “काळ सोकावला हो आता ।”कोण म्हणाले,”कोणीहि उठावे अन शिकायला लागावे.म्हणजे मोकळे रान मिळाल्यासारखे कि।”त्यातच आणखी भर म्हणजे उच्च वर्गातील एक शिक्षक मुलींना शिकवायला जाऊ लागले.त्यामुळे वरिष्ठ वर्गातील लोक आणखी खवळले.त्यांनी त्या शिक्षकाला धमकावले.त्यामुळे भीतीने त्याने मुलींना शिकवण्याचे काम सोडून दिले.जोतिबांच्या शाळेत आता कोण शिकवणार,असा प्रश्न निर्माण झाला. परंतु जोतिबामागे सरणार नव्हते.त्यांनी सावित्रीबाईंनाच मुलींना शिकवण्यासाठी राजी केले.दुसऱ्या दिवसापासून सावित्रीबाई घराबाहेर पडल्या. मनातून त्या तशा घाबरलेल्याच होत्या,तरीही धीर धरून त्या शाळेकडे निघाल्या. रस्त्याने त्या एकट्याच चालत होत्या. स्त्रियांना एकटीने असे घराबाहेर पडलेलं पाहिलेले नसल्याने रस्त्यातील माणसे त्यांच्याकडे टकामका पाहू लागली.त्यांना अचंबा वाटला. त्या काळी स्त्रिया एकटीने अशा बाहेर पडत नसत. आणि सावित्रीबाई तर एकट्याच निघालेल्या पाहून त्या कुठे जातात,याचेच कुतुहूल वाटून काही लोक त्यांच्यामागे निघाले. शाळा जवळ आली,तशा त्या आत शिरल्या. तसे पाहणाऱ्यांच्या लक्षात आले कि,फुल्यांच्या अर्धांगी शाळेत जाऊ लागल्या आणि हि बातमी पुण्यात सगळीकडे पसरली.आपली शिक्षणातील मक्तेदारी संपेल कि काय,या भीतीने उच्च वर्गातील लोकांची तळपायाची आग मस्तकाला पोहोचली.
“फुल्यानी आपल्या पत्नीला शाळेत शिकवायला पाठविले,म्हणजे अधापतन चा कळस झाला.”
“एक स्त्री शिकवायला लागली “
“आता समाजाचे काय होणार?”या असा एकच कांगावा उच्च वर्गातील काही लोकांनी सुरु केला.
शाळेत थोड्याशा मुली आल्या होत्या,त्यामुळे सावित्रीबाईंना हायसे वाटले.त्यांचा आज शिकवण्याचा पहिलाच दिवस होता.कसे शिकवतात,याचा त्यांना अनुभव नव्हता आणि माहीतही नव्हते, पण तरीसुद्धा त्या आल्या होत्या. आजपर्यंत त्या अशा घराबाहेर कोणाशी बोलल्या नव्हत्या आणि आज त्या बाहेरच्या मुलींसमोर उभ्या होत्या.
सकाळी त्या शाळेत शिकवू लागल्या आणि संध्याकाळी घरी,शाळेत कसे शिकवावे,याचा अभ्यास करू लागल्या. आपण शाळेत शिकवू लागलो म्हणून लोक चर्चा करू लागलेले पाहून त्या जोतिबांना म्हणाल्या “अहो , माझ्या शाळेत शिकवण्याने एवढा आरडा-ओरडा होणार असेल तर तुम्हालाही त्रास होणार. दुसरा एखादा पंतोजी बघा हवा तर.”
तेंव्हा जोतिबा म्हणाले,”आपण हा त्रास सहन करायचा.मी शिकत होतो,तेंव्हाही लोक असेच ओरडत होते कि,अन पंतोजीला पगार देणे आपल्याला कसे परवडणार? पतीच्या अशा खुलाशाने सावित्रीबाईंना धीर आला. घेतला वसा सोडायचा नाही,हे त्यांनी मनाशी ठरवले.
अंगावर चिखलाचे गोळे फेकले
कितीही कष्ट पडले,अपमान झाला तरी सोसायचा,सहन करायचा,असे ठरवून सावित्रीबाई शिकविण्यासाठी शाळेत जाऊ लागल्या. त्या शाळेत गेल्या,कि टवाळखोर लोक खोलीच्या खिडकीत डोकावून त्यांना त्रास द्यायचे नको ते शब्द बोलायचे. त्या तिकडे दुर्लक्ष करून शिकविण्याचे काम करायच्या. तरीही बाहेर उभे असलेले लोक मोठं मोठ्याने काही तरी बोलून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करायचे. कनिष्ठ वर्गातील स्त्रिया शिकवायला लागल्या,म्हणजे जणू समाजावर मोठं संकटच आले,धर्म बुडाला,असे त्यांना वाटायचे. जोतिबांच्या पत्नीला शिकविण्याचे काम करू द्यायचे नाही,त्यांना घरीच बसवायचे, त्यांची निंदा-नालस्ती करायची , याचा जणू अशा लोकांनी विडाच उचलला होता.सावित्रीबाई शाळा संपवून घरी जाऊ लागल्या,कि असे लोक त्यांना त्रास द्यायला सुरुवात करायचे.कोणी त्यांना खडे मारायचे.त्यांच्या अंगावर शेण,चिखलाचे गोळे फेकायचे.अपमानकारक शब्द बोलून त्यांना सतावण्याचे प्रयत्न करायचे. एकदा तर कहरच झाला. एकाने त्यांना दगड मारला.तो नेमका त्यांच्या डोक्याला लागला. डोक्याला खोक पडली त्यातून भळाभळा रक्त वाहू लागले, परंतु काही न बोलता त्या तशाच शाळेत गेल्या. एके दिवशी त्या शाळेत चालल्या असता अशा लोकांनी त्यांचा रास्ता अडवला.तरीही त्या घाबरून गेल्या नाही. मनातील भीती त्यांनी चेहऱ्यावर दाखवली नाही. त्या जागेवरच गप्प उभ्या राहिल्या.त्या जागेवरच गप्प उभ्या राहिल्या. सूर्याकडे पाहत नमस्कार करीत म्हणाल्या,”हे परमेश्वरा, मी माझे कर्तव्य करीत आहे. देवा या लोकांना क्षमा कर ,त्यांचे भलं कर.”
सावित्रीबाईंचे ते सौजन्य,त्यांच्या मुखावरील सात्विक भाव पाहून रस्ता अडवून उभे असलेले लोक मुकाट्याने बाजूला झाले. नंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांच्याबरोबर जोतिबांनी एक शिपाई दिला. सावित्रीबाईंच्या अशा धीरोदत्त वागण्याने जुन्या विचारसरणीच्या उच्च वर्गातील लोकांचा मात्र संताप अनावर झाला.
कर्तव्यासाठी घर सोडले
दिवस भराभरा चालले होते. सावित्रीबाई आणि जोतिबा आपले कर्तव्य मन लावून,अपमान सहन करून शिकवण्याचे काम करीतच होते. शाळेचा व्याप वाढला होता. घरातले कामकाज संपवून सावित्रीबाई घरातच वाचत बसायच्या किंवा लिहीत बसायच्या.
एके दिवशी जोतिबांनी घरी यायला खूप उशीर झाला. सावित्रीबाईना त्यांची काळजी वाटू लागली. कारण त्यांनी शाळा काढल्यापासून कर्मठ विचाराचे लोक त्यांच्यावर खवळून होते. त्यांच्या जीवाला काही दगाफटका होईल,या भीतीने सावित्रिबाईना ते घरी येईपर्यत जीवाला घोर लागलेला असे. इतक्यात जोतिबा आले. खूप रात्र झाली होती. आपले वडील न झोपता अजून जागेच आहेत, हे पाहून जोतिबा त्यांना म्हणाले,”आबा,झोपा आता.खूप रात्र झाली आहे.”
“माझा नको विचार करुस.पण तू इतक्या उशिरा घरी येतोस ?कशासाठी हि शिकवायची पीडा मागे लावून घेतलीस?स्वतः शिकला ते शिकला आणि वर बायकोलाही शिकवलंस “. जोतिबाचे वडील संतापून बोलत होते. आपल्या सुनेने असे शिकवण्यासाठी घराबाहेर पडणे त्यांना आवडत नव्हते. त्यांनी सावित्रीबाईना शाळेत पाठवू नको,असे जोतिबांना सांगितले. खरे तर जोतिबांच्या वडिलांची काही चूक नव्हती.जुन्या विचारसरणीचे कर्मठ लोक त्यांना भडकावून देत होते. आपल्या मुलाला आणि सुनेला शाळा बंद करण्यास सांगा.नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील असेही काही लोक त्यांना सांगून भीती घालीत होते.
म्हणूनच ते जोतिबांवर चिडले होते.म्हणाले,”मी बाहेरच्या लोकांना काबुल करून आलो आहे कि ,माझा मुलगा आणि सून एक तर शाळा सोडतील,नाहीतर मी त्यांना घराबाहेर काढीन.पण लेकरा,मी तुम्हाला कसे रे घराबाहेर जायला सांगू? इकडे आड तिकडे विहीर,अशी माझी अवस्था झाली आहे बघ. आपले वडील आपल्यामुळे आपत्तीत सापडलेले पाहून जोतिबांनी आपले कर्तव्य न सोडता घराबाहेर पडण्याचे ठरवले.सावित्रीबाई हे सर्व ऐकत होत्या. दुसऱ्या दिवशी वडिलांना नमस्कार करून जोतिबा आणि सावित्रीबाईंनी आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी घर सोडले.
जीवावरचा प्रसंग
घराबाहेर पडल्यावर समोर अडचणींचा जणू डोंगरच उभा राहिला. चार कपड्यांशिवाय जवळ काही नव्हते. सावित्रीबाई आपल्या पतीच्या पाठीशी सावली बनून आपले शिकवण्याचे कर्तव्य पार पाडीत होत्या.
एकदा त्यांनी वर्गातील मुलींना’मी आणि माझा धर्म’ या विषयावरचा निबंध लिहिण्यास सांगितला होता.रखमा नावाच्या मुलीने तो लिहून आणला होता. ती होती बारा-चौदा वर्षांची.आपला निबंध तिने वर्गात वाचून दाखविला.तिने निबंधात व्यक्त केलेले विचार ऐकून सावित्रीबाईंना आश्चर्य आणि आनंद वाटला. आपण शिकवलेल्या मुलीने एवढा सुंदर निबंध लिहिला,हे पाहून त्यांना आपल्या शिकवण्याचे सार्थक झाले, असे वाटले.
एके दिवशी रात्रीची जेवणे झाल्यावर सर्व काम आटोपून सावित्रीबाई चटई अंथरून झोपल्या.जोतिबा लिहीत होते.थोड्या वेळाने तेही झोपलं. काही वेळात दाराचा कुरकुर आवाज ऐकू आला. म्हणून सावित्रीबाईंनी विचारले, “कोण आहे बाहेर ?”
बाहेरची माणसे दबकतच हळूहळू आत आली. त्यांनी जोतिबांवर हात उगारला सावित्रिबाईमध्ये पडल्या. आपला हात आवरा,असे त्या आलेल्या माणसांना सांगू लागल्या. “आम्ही हात आवरायला आलो नाही बाई,तुम्ही बाजूला व्हा.”त्यातला एकजण ओरडला.
“कशाला आलात मग ?” जोतिबांनी विचारले. “आम्ही तुमचा निकाल लावण्यासाठी आलोत,”एक मारेकरी गुरकावत म्हणाला. “अरे पण मी तुमचा काय अपराध केला,म्हणून तुम्ही माझ्या जीवावर उठलात ?”जोतिबांनी विचारले.
“तुम्ही दोघे येथे शाळा शिकवण्याचे काम करता. ते थांबावे म्हणून तुम्हाला मारण्यासाठी आम्हाला काही लोकांनी पैसे देऊन पाठवले आहे.” एक मारेकरी म्हणाला.
“म्हणजे पैशासाठी तुम्ही मला मारणार? ठीक आहे. मला मारल्यावर तुम्हाला पैसे मिळणार,तर मग मारा मलाज्या गरीब जनतेसाठी मी काम करतो आहे,त्यांच्याच हातून मला मरण येणार असेल, त्यांचा फायदा होणार असेल,तर हि घ्या माझी मान।”असे म्हणत जोतिबा आपली मान झुकवून मारेकऱ्यांपुढे उभे राहिले.
मारेकऱ्यांना जोतिबा म्हणजे देवमाणूस वाटले. त्यांना आपली चूक कळून आली.हातातील कुऱ्हाडी त्यांनी टाकुन दिल्या.’यापुढे आम्ही तुमचे अंगरक्षक म्हणून राहणार” असे त्यांनी सांगितले. जोतिबांच्या सांगण्यावरून ते रात्रिच्या शाळेत जाऊ लागले. संकट टळले हे पाहून सावितीबाईंना खूप हायसे वाटले.त्यांचा धीर वाढला. काहीही झाले,कितीही संकटे आली,तरी आपले कर्तव्य सोडायचे नाही, टाळायचे नाही,असा निर्धार त्यांनी पुन्हा एकदा मनाशी केला.
बालहत्या प्रतिबंधक गृह
जिवावरचे प्रसंग येऊ लागले तरी सावित्रीबाई मनाने खचल्या नाहीत. आपले कार्य त्या नेटाने पुढे चालवू लागल्या. शाळा चांगली चालली होती. मुलींची संख्या वाढत होती. त्या मन लावून शिकविण्याचे काम करीत होत्या. कधी कधी डोक्याचे मुंडन केलेल्या स्त्रिया त्यांना दिसायच्या. त्याबद्दल त्या जोतिबांना विचारायच्या,म्हणून मग जोतिबांनी त्यांना एक पुस्तक वाचायला दिले. त्या पुस्तकात विधवा स्त्रियांचे दुःख वर्णन केलेलं होते.त्यांच्यावर कोणते अत्याचार होतात, हे त्यांना ते पुस्तक वाचून समजले. ते वाचून त्यांच्या डोळयात पाणी आले.आपण यासाठी काहीतरी करायचे, हे त्यांनी मनाशी ठरवले. त्या काळी विधवा स्त्रियांचे जीवन म्हणजे नरक यातना असेच होते. त्यांना खूप अत्याचार सहन करावा लागायचा.त्यातून त्यांना मुले होत असत. मग समाजाच्या भीतीने या स्त्रिया हि मुले कोठेही टाकुन देत. नुकतीच जन्मलेली अशी मुले मग मरणाच्या दारात असत किंवा कोणी मिशनरी लोक त्यांना घेऊन जात. आणि त्यांचे पालन करून मोठेपणी त्यांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा देत असत. काही तरुण विधवा स्त्रिया अब्रुच्या भीतीने अत्याचार झाल्यावर जीव देत असत.
सावित्रीबाईंनी अशा स्त्रियांचे दुःख दूर करण्याचे ठरवले. त्यांनी ‘ एक बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरु करण्याचे ठरवले. आपण असा एक आश्रम काढला आहे,हे त्यांनी हस्ते परहस्ते इकडे तिकडे कळविले कि,”ज्या स्त्रियांना अत्याचारातून दिवस गेले असतील,त्यांनी होणारी मुले कुठेही टाकून न देता, आमच्या आश्रमात येऊन सुखरूपाने बाळंत व्हावे.आम्ही त्यांची नावे गुप्त ठेवू. अशा मुलांचेआम्ही पालन-पोषण करू.”सावित्रिबाईनी अशी व्यवस्था केल्यावर फसवलेल्या,अत्याचार झालेल्या स्त्रिया त्यांच्या आश्रमात येऊ लागल्या. त्यांना होणाऱ्या मुलांना सावित्रिबाई पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळू लागल्या. त्यामुळे बालहत्या थांबली. ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे जाणारी मुलें आता सावित्रीबाईंच्या आश्रमातच मोठी होऊ लागली. मानवतेचे कार्य करणाऱ्या सावित्रिबाई म्हणजे अनाथ मुलांच्या ‘माताच’ बनल्या.
अनाथांच्या माता
एके दिवशी जोतिबा एका तरुण विधवा मुलीला घरी घेऊन आले. आणि सावित्रीबाईना म्हणाले, हि बघ तुझी मुलगी ।’
सावित्रिबाईना स्वतः चे काही मुलबाळ नव्हते. म्हणूनच त्या अनाथ मुलांच्या माता बनल्या होत्या. त्यांना पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळत होत्या. रात्री चटया विणून त्यातून मिळणाऱ्या पैशातून घर खर्चाला हातभार लावीत होत्या. आणि आता घरात नवीन मुलगी आली होती.तिला दिवस गेले होते. कोणी तरी अत्याचार केल्याने तिला जीव नकोसा झाला होता. आता मात्र सावित्रिबाईनी तिला आधार दिला होता. त्या मुलीचे नाव होते काशी. काही दिवसांनी काशीला मुलगा झाला आणि त्या मुलाला सावितीबाईंकडे सोपवून काशी निघून गेली. देवानेच आपल्याला मुलगा दिला असे सावित्रीबाईंना वाटले. दोघांनाही खूप आनंद झाला. त्यांनी मुलाचे बारसे करून त्यांचे नाव ‘यशवंत’ ठेवले. स्वतःचाच मुलगा म्हणून जोतिबा-सावित्रीबाई त्याला वाढवू लागले. हाच मुलगा पुढे ‘यशवंत फुले’ म्हणून नावारूपास आला. जोतिबांनी त्याला दत्तक घेतले होते.
जोतिबांनी समाज सेवेचे असे कार्य सुरु केल्यावर सनातनी कर्मठ विचाराच्या लोकांनी खूप त्रास दिला. परंतु सावित्रीबाईंनी घेतला वसा सोडला नाही. पुढे जोतिबांनी ‘सत्यशोधक समाज’ ची स्थापना केली. जाचक रूढी-परंपरा, चाली-रीतींचा त्याग करून माणसांनी माणसासारखे राहावे, वागावे, माणुसकीचा धर्म पाळावा, सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहेत, असे मानून कोणताही भेदाभेद न धरता एकमेंकांशी गुण्यागोविंदाने राहावे,अशी या समाजाची तत्वे होती.
सावित्रीबाई आपल्या पतीच्या मानवतेच्या कामात काहीही मागे राहिल्या नाहीत.त्यांनी आपल्या पतीला मोलाची साथ दिली. म्हणूच मानवतेचे पुजारी जोतिबा एक महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले.
आजपर्यंत दोघा पती-पत्नींनी खूप कष्ट करून परिश्रम घेऊन जगाला माणुसकीची धर्माची शिकावण दिली होती. तसेच आचरण करून समाज जागृतीचे महान कार्य केले होते. ‘महात्मा’ म्हणून गौरव झालेले जोतिबा एके दिवशी निजधामाला गेले. सावित्रीबाईंवर दुःखाचा जणू डोंगरच कोसळला. परंतु त्यांनी स्वतःला सावरले.पतीचे कार्य त्यांनी आयुष्याच्या अंतापर्यंत सुरूच ठेवले. म्हणूनच लोक त्यांना ‘क्रांतीज्योती’, ‘महान साध्वी’ सावित्रिबाई फुले म्हणून ओळखू लागले.सावित्रीबाई,म्हणजे समाजसेवेची अखंड तेवणारी ज्योतच होय.त्याच्या स्मुर्तीला शतशः प्रणाम।
हे पण वाचा- शांतिनिकेतन रवींद्रनाथ टागोर
हे पण वाचा- स्वातंत्र्यवीर सावरकर