
Biography of Netaji Subhashchandra Bos |नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवनचरित्र
सुभाषचंद्रांचा जन्म
ओरिसा राज्यात जगन्नाथपुरीचे पवित्र तीर्थक्षेत्र आणि जवळच कटक हे राजधानीचे शहर. या शहरात जानकीनाथ बोस यांचे घराणे फारच प्रसिद्ध होते. लोकात त्यांना फार मान असायचा.तसेच सरकार दरबारीही त्यांचे मोठे वजन होते. सरकारने त्यांना मानाची ‘रावबहादूर’हि पदवी दिली होती. कटक शहरातील ते एक नामवंत आणि लोकप्रिय वकील होते. कामानिमित्त कलकत्याच्या हायकोर्टात त्यांचे नेहमी जाणे-येणे असायचे. त्यांच्या पत्नीचे नाव प्रभावतीदेवी.त्या अत्यंत धामिर्क आणि रामकृष्ण परमहंसांच्या मोठया भक्त होत्या. अशा प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराण्यात जानकीनाथ आणि प्रभावतीदेवी यांच्या पोटी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. तो दिवस २३ जानेवारी १८९७. सुभाषचंद्रांना सात भाऊ आणि बहिणी होत्या. त्यांचे कुटुंब खूप मोठे होते. नातेवाईक आणि इतर मंडळींचा घरात सारखा राबता असायचा. प्रभावतीदेवींचा सर्व वेळ घराचा कारभार,पूजा अर्चा यातच जायचा.घरात नोकर चाकरही होते. युरोपियन मिशनने चालवलेल्या शाळेत त्याचे नाव घातले. शाळेत इंग्रजी,घरात बंगाली आणि घराबाहेर उडिया हि भाषा. अशा तिरपगड्यात सुभाषचंद्र शिकू लागले.
सुभाषचंद्रांचे शिक्षण
सुभाषचंद्रांची शाळा फार कडक शिस्तीची नीटनेटकी आणि टापटिपीची होती. शाळेत वेळेवर जावे लागे. अभ्यासाबरोबरच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत., इकडे लक्ष पुरविले जात असे. प्राथमिक शिक्षणानंतर सुभाषचंद्र रेव्हनशा स्कुल मध्ये जाऊ लागले. ते तसे खूप हुशार या शाळेत त्याच्या बुद्धिमतेची चमक दिसू लागली. शाळेचे मुख्याध्यापक वेणीमाधवदास एक आदर्श शिक्षक होते. धार्मिक आणि त्यागी वृत्तीचे होते. त्यांच्या आचारविचारांचा सुभाषचंद्रांवर मोठा प्रभाव पडला. इतर शिक्षक शिकवीत तर वेणीमाधवदास संस्कार करीत. अभ्यासाशिवाय सुभाषचंद्र वाचनालयात वाचन आणि चिंतन करीत असत. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा, त्यांच्या मनावर फार खोलवर परिणाम झाला. त्यांना इंग्रजी कविता आवडायच्या. अभ्यासात सुभाषचंद्र हुशार होते. इंग्रजीवर त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. संस्कृतमध्ये त्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळाले.
सुभाषचंद्रांची प्रतिज्ञा
सुभाषचंद्रांचे एक-एक गुण दिसून येऊ लागले. पंधरा-सोळा वर्षाचे वय म्हणजे काहीच नाही. या वयात सुभाषचंद्रांच्या मनात अनेक विचार येत. आपला देश,समाज, गरीब माणसे, प्राणी यांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम उफाळून येई. ते पुढील शिक्षणासाठी कलकत्याला आले. सुभाषचंद्रांनी कलकत्ता येथे प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रवेश केला. ते स्वतंत्र विचाराचे होते. आपले विचार ते कोणावर लादत नसत. शिस्त, टापटीप आणि स्वावलंबन या गुणांचे ते भोक्ते होते. आपला देश पारतंत्र्यात आहे,हे ते पाहत होते. देशासाठी काहीतरी करावे,असे त्यांना सतत वाटायचे. कलकत्त्यातील काही मित्रांनी एकत्र येऊन ‘विवेकानंद समूह’ नावाचे मंडळ स्थापन केले होते. विवेकानंदांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी,या मंडळाने एक महाविद्यालय स्थापना करण्याचे ठरवले होते. त्या मंडळातील सभासदांनी तशी प्रतिज्ञा करून शपथ घेतली होती. जन्मभर अविवाहित राहायचे. अल्प वेतनांवर उदरनिर्वाह करायचा. उरलेला वेळ समाजकार्य करून दुखी लोकांचे अश्रू पुसायचे.देशसेवा करायची, अशी ती शपथ होती.
सुभाषचंद्र आय.सि.एस. झाले
सुभाषचंद्रांना एका मिशनच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. सुभाषचंद्र आता भरपूर अभ्यास करू लागले. मुलांच्यात मिसळून व्यायाम करू लागले. सुभाषचंद्र बी. ए. ची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्याचवेळी सुभाषचंद्रांचे वडील कलकत्याला आले. त्यांनी सुभाषने इंग्लंडला जाऊन आय. सी.एस. व्हावे म्हणून त्यांचे मन वळवले. त्यानंतर सुभाषचंद्र बोटीने इंग्लंडला गेले. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. आठ-नऊ महिन्यात नऊ विषयांचा अभ्यास करायचा होता. परीक्षा कठीण होती. ते जोमाने अभ्यास करू लागले.केम्ब्रिज मध्ये भारतीय विद्यार्थ्यांची सभा भरायची.तेथे अनेक देशभक्त लोकांची भाषणे ऐकण्याचे भाग्य त्यांना लाभले. तेथे एक मुक्त व्यासपीठ होते. तेथे मोठे मोठे लोक जमा व्हायचे. एखाद्या विषयावर मोकळेपणाने चर्चा करायचे. प्रत्येकजण आपले विचार मांडायचे. जीवनाचे ज्ञान ग्रहण करीत असता सुभाषचंद्र अभ्यासही करीत होते. आणि काय आश्चर्य अगदी कमी वेळ मिळूनही ती कठीण आय.सी.एस.परीक्षा ते पास झाले.त्यावेळी सुभाषचंद्र फक्त २२ वर्षाचे होते. त्या काळी कोणीही आय.सी.एस. परीक्षा पास झाल्यावर सरकारी नोकरीचा हुकूम निघत असे. असा हुकूम सुभाषचंद्रांनाही मिळाला.फक्त तो घ्यायचा कि नाही,हे सुभाषचंद्रांनी ठरवायचे होते. त्यालाच सनद असे म्हटले जाई. पण सुभाषचंद्रांना तर अशी सनद घेऊन सरकारी नोकरी करायचीच नव्हती. त्यांचे विचार एकदम वेगळे होते.
मी इंग्रजांची चाकरी करणार नाही
सर्वसामान्य लोकांपेक्षा सुभाषचंद्रांचे विचार वेगळे होते. आपल्या देशाला गुलामगिरीत ठेवणाऱ्या,आपल्या हजारो बांधवांचा छळ करणाऱ्या इंग्रज सरकारची नोकरी करणे, सुभाषचंद्रांना मान्य नव्हते. त्यांनी तशी शपथच घेतली होती. आणि सुभाषचंद्रांना कोणत्याही परिस्थितीत ती शपथ,ती प्रतिज्ञा मोडणार नव्हते. पण वडिलांना आपले विचार कसे कळवायचे,असा प्रश्न सुभाषचंद्रांना पडला होता. मनाच्या अशा अवस्थेत सुभाषचंद्रांनी घरी पत्र पाठवून कळवले. आपण आय.सी.एस. ची सनद स्वीकारणार नाही. आणि ते इंग्रज सरकारलाही कळवले. त्यामुळे खूप खळबळ उडाली.आजवर असे कधी घडले नव्हते. जी पदवी मिळावी म्हणून लोक काहीही करायला तयार होते,त्या पदवीचा असा अपमान ?
सुभाषचंद्रांना गुरु भेटले
आपला सुभाष खूप वेगळा आहे,जिद्दी आहे हे सर्वाना दिसून आले. इंग्लंडमधले शिक्षण संपल्यानंतर ते भारतात यायला निघाले. सुभाषचंद्र दोन वर्ष इंग्लंड मध्ये होते. आपल्या वागण्यामुळे ते विद्यार्थीप्रिय बनले. फावल्यावेळी ते निरनिराळी पुस्तके वाचायचे. जगाचा इतिहास आणि संस्कृती त्यांनी समजून घेतली. परदेशात आपल्या देशाचे नाव खराब होईल,असे वर्तन आपल्या हातून घडू नये याची सुभाषचंद्र काळजी घ्यायचे. असे ज्ञानी,सुसंस्कृत आणि देशप्रेम भरलेले सुभाषचंद्र भारतात परत आले. भारतात आता टिळकयुग संपून,गांधीयुग सुरु झाले होते. गांधीजींनी ब्रिटिश सरकारवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचे आवाहन जनतेला केले होते. असहकार आंदोलनाने त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला हादरे दयायला सुरुवात केली होती. अशा गांधीजींचे विचार समजून घेण्यासाठी सुभाषबाबू त्यांना भेटले. गांधीजींच्या साध्या राहणीमानाने ते प्रभावित झाले.
मग सुभाषबाबू कलकत्याला आले.तेथे त्यांना प्रेरणा देणारा महापुरुष जणू त्यांचीच वाट पहात बसला होता. ते महापुरुष म्हणजे ‘देशबंधू चित्तरंजनदास’ बंगालचे सर्वात लोकप्रिय पुढारी. त्यांनी आपली श्रीमंती,आपला ऐषाराम सोडून उतारवयातही स्वतंत्रलढ्यात उडी घेतली होती. सुभाष बाबूंना जसा गुरु हवा होता तसेच दासबाबू होते.पहिल्या भेटीतच त्यांचे सूर जमले. सुभाषबाबूंनी देशसेवेची आपली तळमळ दासबाबूंजवळ व्यक्त केली.
पहिला तुरुंगवास
१ ऑगस्ट हा दिवस उजाडला. गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीचा वर्धापन दिन. तसेच सुभाषबाबूंच्या जीवनकार्याची सुरुवातही याच दिवशी झाली. ब्रिटिश सरकारवरचा जनतेचा विश्वास उडाला होता. अर्ज-विनंत्या करून स्वातंत्र्य मिळणार नाही. स्वातंत्र्यासाठी लढ्यालाच हवे, हे जनतेच्या लक्षात आले होते. देशभर जनतेने ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकला. जागोजागी परदेशी कापडाच्या होळ्या पेटवल्या. अशाच एका होळीजवळ अग्नीला साक्षी ठेवून सुभाषबाबूंनी देशसेवेची शपथ घेतली.
दासबाबूंनी त्याचवेळी राष्ट्रीय कॉलेज सुरु केले. सुभाषबाबू प्राचार्य म्हणून काम करू लागले. सरकारी कॉलेजपेक्षा आपल्या कॉलेजचा नावलौकीक वाढला पाहिजे,म्हणून त्यांनी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवल्या. शिकविण्याबरोबरच राष्ट्रसेवेसाठी एक स्वयंसेवक दल उभारले. राष्ट्रीय काँग्रेस च्या कार्यातही सुभाषबाबू भाग घेऊ लागले. असहकाराचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ते कार्यकर्त्यांची एकजूट करू लागले. एक लोकप्रिय नेते म्हणून त्यांची कीर्ती वाढू लागली. याच सुमारास ब्रिटनचे युवराज भारतभेटीवर आले. त्याचवेळी भारतीय जनतेने सार्वत्रिक हरताळ पाळला.
सगळीकडे शुकशुकाट होता. सुभाषबाबूंची शक्ती पाहून सरकारने सुभाषबाबूंच्या स्वयंसेवक दलावर बंदी घालणारा हुकूम काढला. तरीही सुभाषबाबूंनी बंदीहुकूम मोडून सभा,मिरवणुका काढून सरकारचा निषेध केला.यामुळे सुभाषबाबूंवर सरकारचा राग वाढला. सरकारने दासबाबू,सुभाषबाबू आणि सवयंसेवकांना पकडून तुरुंगात घातले.त्यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली.सुटून येताच सुभाषबाबूंनी पुन्हा आपले देशकार्य सुरु केले.
मंडालेच्या यातना
त्याकाळी कलकत्ता महानगरपालिका देशातील सर्वात मोठी गणना जात असे. सुभाषबाबूंची त्याचवेळी पालिकेच्या मुख्याधिकारीपदी निवड झाली. या पदाचा वापर त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी केला. पोटापुरते वेतन घेऊन वेतनाचे उरलेले पैसे त्यांनी समाजउपयोगी कामासाठी खर्च केले. त्यांनी स्वतंत्र शिक्षण विभाग सुरु केला.अनेक नव्या शाळा उघडल्या.गरीब वस्तीत दवाखाने उघडले. शहराच्या प्रत्येक भागात फिरून ते लोकांच्या अडी-अडचणी जाणून घेत. त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत. परंतु इंग्रज सरकारला सुभाषबाबूंचे मोठेपण सहन होत नव्हते. काहीतरी कारण काढून त्यांना तुरुंगात टाकायचे त्यांनी ठरवले. त्याचवेळी एका क्रांतिकारकाने एका उर्मट इंग्रज पोलीस अधिकाऱ्यावर बॉम्ब फेकला.त्यामुळे इंग्रज सरकार खवळले. अनेक लोकांना,पुढाऱ्यांना पकडून तुरुंगात टाकले. सुभाषबाबूंनी सरकारच्या या दडपशाहीचा,अत्याचाराचा निषेध करून कडक टीका केली. सरकारला आता सुभाषबाबूंची भीती वाटू लागली. म्हणून इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना पकडून गुपचूपपणे तुरुंगात टाकले. पण हे वृत्त जनतेला कळताच जनता खूप खवळली.त्यामुळे सरकारने सुभाषबाबूंची खूप दूर ब्रह्मादेशातील भीषण अशा मंडालेच्या तुरुंगात रवानगी केली. मंडालेचा तुरुंग म्हणजे दुसरे अंदमानच. नरकयातना भोगायला लावणारा,रोगट हवामानाचा,हळूहळू शरीर पोखरणारा. पण सुभाषबाबू खचले नाहीत. मला माझ्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी जगलेच पाहिजे, असे त्यांनी मनाला बजावले.रोगट हवामानाने सुभाषबाबू तुरुंगातच खूप आजारी पडले. त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर,भारतीय जनता भडकून उठेल याची इंग्रज सरकारला काळजी वाटू लागली. म्हणून उपचाराच्या बहाण्याने त्यांना परदेशात पाठवावे,असे सरकारने ठरवले.तसे सुभाषबाबूंनाही कळवले.देशासाठी मला तुरुंगात मरण आले तरी चालेल. पण सुटका व्हावी म्हणून मी देशत्याग करणार नाही, असे सांगत सुभाषबाबूंनी सरकारला फटकारले. सरकार पेचात सापडले. सरकार नमले. सुभाषबाबुंपुढे सरकारने शरणागती पत्करली. त्यांची तुरुंगातून बिनशर्त सुटका केली
मातृभूमीपासून दूर
तुरुंगातून सुटून आलेल्या सुभाषबाबूंचे जनतेने जोरदार स्वागत केले. त्यांनी पुन्हा देशसेवेला सुरुवात केली. बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. एकदा त्यांनी पुण्याला भेट दिली. तेथे केलेल्या भाषणात ते म्हणाले,भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. आपल्या देशाचे भविष्य आपणच घडविले पाहिजे. स्वतंत्र भारत हेच ध्येय आहे.त्यासाठी पडेल ते कष्ट घ्यायला मी तयार आहे. कलकत्ता येथे त्यांनी प्रथमच युवक काँग्रेसची स्थापना केली. कलकत्ता,लाहोर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी भाग घेतला. देशाला स्वातंत्र मिळालेच पाहिजे.असे आवाहन त्यांनी केले. सुभाषबाबू आता देशाचे एक लोकप्रिय नेते बनले होते.पण सरकारला त्यांची वाढती लोकप्रियता सहन होत नव्हती. काहीतरी खुसपट काढून इंग्रज सरकारने त्यांना पुन्हा तुरुंगात डांबले. तुरुंगात असताना सुभाषबाबूंची प्रकृती पुन्हा ढासळली. परदेशात उपचार केले तरच ते बरे होतील, असे डॉक्टरांनी बजावले पण ते परदेशी जाण्यास तयार नव्हते. पण घरच्या माणसांनी आणि थोर लोकांनी समजूत घातल्यावर ते परदेशी जाण्यास तयार झाले.कडक पोलीस पहाऱ्यात सुभाषबाबू युरोपकडे निघाले भारताचा किनारा दूर जाऊ लागला, तसे मातृभूमीच्या प्रेमाने त्यांचे हृदय भरून आले.
Biography of Netaji Subhashchandra Bos |नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवनचरित्र
स्वातंत्र्य हेच माझे अंतिम ध्येय
मी येथे आलो ते प्रकृती सुधारण्यासाठी हे तर खरेच,परंतु भारताचे स्वातंत्र्य हेच माझे अंतिम ध्येय आहे. म्हणून मी कुठेही असलो तरी ध्येयासाठी झगडत राहणार आहे, असे यूरोपच्या भूमीवर पाय ठेवताच सुभाषबाबू म्हणाले.
सुभाषबाबू उपचारासाठी व्हिएन्ना शहरात दाखल झाले. एका आरोग्यधामात ते राहू लागले. त्यांच्या लोकांशी ओळखी होऊ लागल्या. येथेही ते गप्प बसले नाहीत. जर्मनी इटली येथील पुढाऱ्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कोणी मदत देईल काय,याचा ते अंदाज घेऊ लागले. दररोजचा पत्रव्यवहार पाहण्यासाठी एमिली शेफल,हि ऑस्ट्रलियन मुलगी त्यांची चिटणीस म्हणून काम पाहू लागली. परदेशात ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रचार करू लागले. जर्मनी,पोलंड,चेकोस्लोव्हिया या राष्ट्रांना त्यांनी भेटी दिल्या. तेथे इंग्रज सरकारवर अनेक सभांतून भाषणे करून,त्यांनी जहाल टीका केली. इंग्रज सरकार भारतीय जनतेवर कसे अत्याचार करते,ते जगाला सांगितले. हे पाहून इंग्रज सरकार हादरून गेले. सुभाषबाबूंना यूरोपात येऊन पावणेदोन वर्ष झाली होती. ते जरी यूरोपात असले, तरी भारतात असलेली आपली सत्ता उलथून टाकण्याचे कट-कारस्थान ते रचित असतील,अशी भीती इंग्रज सरकारला वाटत होती. म्हणून त्यांना पुन्हा तुरुंगात टाकावे, असे सरकारला वाटू लागले. त्याचवेळी एक घटना घडली.सुभाषबाबूंचे वडील खूप आजारी पडले. त्यांना भेटण्यासाठी सुभाषबाबू भारताकडे येण्यास निघाले. पण ते कलकत्याला पोहोचेपर्यंत जानकीबाबू देवाघरी गेले. त्यानंतर इंग्रज सरकारने त्यांना पुन्हा यूरोपात पाठवून दिले,तीन वर्ष यूरोपात काढल्यावर,ते पुन्हा भारतात आले.
स्वातंत्र्यासाठी बलिदान
भारतात परत आल्यावर सुभाषबाबूंची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली.तेथे त्यांनी तडफदार भाषण केले. स्वातंत्र्यलढ्याचा प्रचार करण्यासाठी ते देशभर फिरले. जवाहरलाल नेहरू, सावरकरांच्या त्यांनी भेटी घेतल्या. आपण भारतातून निसटून परदेशात जावे. तेथूनच भारताच्या सशस्त्र स्वातंत्र्यलढ्याला सुरुवात करावी,असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. कलकत्त्यातील इंग्रज लोकांचे स्मारक उडवून लावण्याची,एक योजना सुभाषबाबूंनी आखली. पण त्याचा सुगावा इंग्रजांना लागताच, त्यांनी पुन्हा सुभाषबाबूंना तुरुंगात टाकले. हि त्यांची तुरंगात जाण्याची अकरावी वेळ होती. त्यांनी तुरुंगातच उपोषण सुरु केले. त्यांची प्रकृती खालावली. कितीही प्रयत्न केला तरी ते काही खात नव्हते. त्यामुळे इंग्रज सरकार घाबरून गेले. सरकारने त्यांना त्यांच्या घरी आणून सोडले आणि घराभोवती कडक पोलीस पहारा बसवला. काहीतरी करून येथून निसटावे, परदेशात जावे. तेथूनच भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र लढा उभारावा, असे त्यांनी मनाशी योजले.
एके दिवशी कोणालाही काही सुगावा लागू न देता,सुभाषबाबू पठणाचा वेष करून घरातून निसटले. अनेक मित्रांच्या गुप्त मदतीने खूप हाल-अपेष्टा भोगून यूरोपात पोहोचले. यूरोपच्या भूमीवरून भारताचा स्वातंत्र्यलढा चालवणे, हि खूप अवघड गोष्ट होती. जीवावर उदार होऊन त्यांनी असा लढा उभारण्याचे ठरवले. स्वातंत्र्य मिळविणे हा भारताचा अधिकारच आहे, हे त्यांनी जगाला पटवून द्यायला सुरुवात केली होती. त्यासाठी ते जर्मनीच्या हिटलरला भेटले. जगात तेंव्हा महायुद्ध सुरूच होते.
भारताच्या स्वातंत्र्यलढयासाठी कोणती मदत करावी,याचे मागणीपत्र त्यांनी जर्मन सरकारला सादर केली. महायुद्धात जर्मनीला विजय मिळाल्यास जर्मनीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करावी. भारताला सशस्त्र लढ्यासाठी लागणारी साधने पुरवावीत.स्वतंत्र रेडिओ केंद्र स्थापण्यास मदत करावी. पन्नास हजारांचे सेनादल उभारून द्यावे. सेनादलाला आवश्यक ती शस्त्रे पुरवावीत. हे सेनादल इंग्रजांना भारतातून पळवून लावील आणि मग भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास येईल. या सर्वांसाठी खूप खर्च येईल. भारत स्वतंत्र झाल्यावर भारत सरकार खर्च झालेले पैसे परत करील.अशा प्रकारच्या मागण्या सुभाषबाबूंनी जर्मन सरकारकडे केल्या. या कामासाठी थोडा वेळ लागणार होता. म्हणून मग सुभाषबाबू व्हिएन्नाला गेले. मागच्यावेळी तेथील एमिली शेकल या तरुणीने त्यांना खूप मदत केली होती. दोघे विचाराने खूप जवळ आले होते. म्हणून त्यांनी विवाह करण्याचे ठरविले.त्यांनी मग बर्लिनमध्ये नोंदणी पद्धतीने लग्न केले. तेथेच त्यांनी आपला संसार थाटला. जर्मन सरकारने सुभाषबाबूंना मदत करण्याचे ठरवले.म्हणून सुभाषबाबूंनी पहिली बैठक घेतली.तोपर्यंत त्यांना मदत करण्यासाठी अनेक मोठे लोक येऊन मिळाले होते. सुभाषबाबूंचे कार्य सुरु झाले. स्वतंत्र्य भारत केंद्र सुरु झाले. त्यानंतर सुभाषबाबूंनी असे जाहीर केले कि,स्वतंत्र भारत केंद्राचे नाव ‘आझाद हिंद संघ’ असे राहील. रेडिओ केंद्राचे नाव आझाद हिंद रेडिओ तर सैन्यदलाचे नाव ‘ आझाद हिंद सेना’ असे राहील. ‘जय हिंद हा आपला मंत्र राहील. अशा प्रकारे आपण सर्वजण मिळून इंग्रजांशी लढून भारताला स्वतंत्र करू. ठरल्याप्रमाणे हळूहळू सुभाषबाबूंचे एक कार्य सुरु झाले. त्यांनी मोठे सैन्यदल उभारले. एके दिवशी दिवशी ते ‘आझाद हिंद रेडिओ ‘ वरून भारतीय जनतेला उद्देशून म्हणाले,’मी सुभाषचंद्र बोस,आझाद हिंद रेडिओवरून बोलतोय.भारताला स्वातंत्र्य मिळण्याचा क्षण जवळ आला आहे. इंग्रज साम्राज्याचा शेवट होण्याची वेळ आली आहे. इंग्रजांचा पराभव झाला म्हणजे भारत स्वतंत्र होईल. त्यासाठीच आम्ही आझाद हिंद सेनेची स्थापना केली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही लवकरच इंग्रजांशी सामना करणार आहोत,सुभाषबाबुंचा आवाज ऐकून सर्व भारतीय जनतेला खूप आनंद झाला.
त्याच वेळी सुभाषबाबू आणि हिटलरची भेट झाली. हिटलरने त्यांचा गौरव करून त्यांना भारताचे ‘नेताजी’ असे म्हटले. तेंव्हापासून सुभाषबाबूंना लोक ‘नेताजी’ असे म्हणू लागले. मधल्या काळात सुभाषबाबूंना कन्यारत्नाचा लाभ झाला होता. तिकडे जपानने इंग्रजांशी लढाई सुरु केली होती. हे युद्ध ब्रह्मादेशापर्यंत,म्हणजे भारताच्या पूर्व सीमेपर्यंत येऊन ठेपले होते. अशावेळी आपण तिकडे जाऊन जपानच्या मदतीने इंग्रजांशी लढा द्यावा, असे सुभाषबाबूंनी ठरविले. पत्नी एमिली आणि आपल्या लहान मुलीचा निरोप घेऊन सुभाषबाबू जपानला आले. जपानने त्यांना सर्व ती मदत करण्याचे मान्य केले. आझाद हिंद झिंदाबाद, भारत माता कि जय, चा युद्धघोष करीत सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना, भारताच्या पूर्व सीमेकडून इंग्रजांशी सामना देत, भारताला स्वतंत्र करण्यासाठी लढू लागली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मदत मिळवण्यासाठी सुभाषबाबू मलाया, सिंगापूर, ब्रह्मादेश या ठिकाणी फिरत होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी काही महिलाही तयार होत्या. त्यांचा एक स्वतंत्र विभाग ‘झाशीची राणी पथक’ स्थापन झाला.
त्यानंतर सुभाषबाबूंनी सिंगापूर येथे भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली. त्या दिवशी त्यांनी लष्करी पोशाख अंगावर चढवला. अनेक देशांनी भारताच्या या सरकारला मान्यता दिली.
थोड्याच दिवसात इंग्रजांचा पराभव होऊन, भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला येईल, असे दिसू लागले. पण दैवाचे फासे एकदम उलटे पडले. ऑगस्ट १९४५ मध्ये विमानातून अपघात होऊन त्यातच सुभाषबाबूंचे निधन झाले. आज आपला देश जगातील एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून वाटचाल करीत आहे. त्यासाठी सुभाषबाबूंनी जो अतुलनीय पराक्रम केला, साहस दाखविले आणि शेवटी देशासाठी प्राणाचे बलिदान केले, त्यांना मानाचा मुजरा करूया.
।जय हिंद।
हे देखील वाचा:- सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती
हे देखील वाचा:- रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी माहिती