
Shantiniketan Ravindranath Tagore|शांतिनिकेतन रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथांचा जन्म
कलकत्ता नगरात ७ मे १८६१ या दिवशी रवींद्रनाथ टागोरांचा जन्म झाला. टागोर घराणे खूप प्रसिद्ध आणि मोठे होते. त्यांच्या वडिलांचे नाव देवेन्द्रनाथ.ते सत्वशील वृत्तीचे होते. लोक त्यांना आदराने’महर्षी’ असे म्हणत.या घराण्याचे खरे नाव बंदोपाध्याय असे होते. अगदी सोज्वळ आणि निर्मल वातावरणात रवींद्रनाथ लहानाचे मोठे होत होते. या कुटुंबाचे राहणीमान अगदी साधे होते.कपडे, खाणे-पिणेही साधे होते. रवींद्रनाथ वयाने लहान असल्यामुळे त्यांना एकट्याला घराबाहेर जात येत नसे.त्यांना एकट्याने बाहेर जायला परवानगीही नव्हती. पण रवींद्रनाथांना पहिल्यापासून निसर्गात रमायला आवडायचे. त्यांचे घर म्हणजे जणू शाळाच होती. साहित्य,कला,चित्रकला, नाट्यकला अशा गोष्टी तेथे शिकता येत असत. शिवाय कसरत आणि व्यायाम सुद्धा नियमितपणे करावा लागे. रवींद्रनाथ घरीच शिकत असत. त्यासाठी शिक्षक घरी येत. त्यामुळे मनात असून सुद्धा त्यांना घराबाहेर जाता येत नसे.
रवींद्रनाथांचे शिक्षण
रवींद्र नाथांना अभ्यासाचा कंटाळा होता,तरी त्यांना शाळेत जावेसे वाटायचे. त्यांचे मोठे भाऊ दररोज शाळेत जायचे. पण घरातले लोक त्यांना शाळेत पाठवत नसत. मुलांना शाळेत न्यायला घोडागाडी होती.रवींद्रनाथांचे भाऊ घोडागाडीतुन शाळेला जात. एकेदिवशी घोडागाडी दारात येऊन थांबली आणि रवींद्रनाथांनी शाळेत जाण्याचा हट्ट धरला.रडून गोंधळ घातला. कितीही समजूत घातली तरी,ते रडायचे थांबेनात.शेवटी कंटाळून घरच्या लोकांनी त्यांना शाळेत पाठवायचे काबुल केले.त्यांना घरी शिकवणाऱ्या गुरुजींना मात्र हे आवडले नाही. ते रागातच त्यांना म्हणाले,”रवी!आत्ता तू शाळेत जायचा हट्ट करतोस.त्यासाठी रडतोस. पण पहा बरं,दोन दिवसांनी शाळा नको म्हणून रडू लागशील.”आणि झालेही तसेच.चार भिंतींच्या बंदिस्त जागेत, तेही मुलांच्या गराड्यात शिकणे रवींद्रनाथांना संकटासारखे वाटू लागले. खेळसुद्धा मनासारखे खेळता येत नसत.असे जखडून रहात शिकणे,मोकळ्या वृत्तीच्या रवींद्रनाथांना मानवण्यासारखे नव्हते. शाळेला जाणे कसे टाळावे,याचा ते आता विचार करू लागले.
बालगृहातील दिवस
मुलांना त्या काळी बालगृहामध्ये ठेवायचा रिवाज होता. रवींद्रनाथांनाही बालगृहात ठेवले होते. मुलांचे सर्व काही करायला नोकर मंडळी असत. त्यामुळे मुलांना आईच्या मायेची ऊब फारशी मिळत नसे. रोज आईचे दर्शन होत नसे.जर एखादा मुलगा आजारी पडला,तरच त्याला आईजवळ ठेवण्यात येत असे. मुलांची सर्व तयारी नोकर करीत. त्यांना कपडे घालणे,त्यांना जेवायला घालणे अशी कामे नोकरच करीत असत. हि नोकर मंडळी नोकरासारखीच वागायची.आई जशी मुलांना प्रेमाने खाऊ घालते ,तसे नोकर वागत नसत. त्यांच्या मध्ये एक गुण मात्र चांगला होता. ते रामायण-महाभारतातील गोष्टी चांगल्या रंगवून सांगायचे.त्यामुळे त्या गोष्टी रवींद्रनाथांच्या चांगल्या लक्षात रहात असत.
रवींद्रनाथांची मुंज
रवींद्रनाथ दिसामाशी मोठे होत चालले होते. त्याचे मुंजीचे वय होत आले होते. म्हणून वडील देवेंद्रनाथांनी त्यांची मुंज करायचे ठरवले.त्यावेळी रवींद्रनाथ १२वर्षाचे झाले होते. रवींद्रनाथांचा मोठा भाऊ सोमेन्द्रनाथ,भाचा सत्य यांच्याही मुंजी व्हायच्या होत्या. म्हणून तिघांच्याही मुंजी एकाचवेळी करण्याचे ठरवले. देवेंद्रनाथ प्रत्येक गोष्ट आखीव-रेखीव पद्धतीने करीत असत. व्यवस्थितपणा त्यांना फार आवडायचा.त्याचप्रमाणे त्यांना तिन्ही मुलांच्या मुंजीसुद्धा व्यवस्थितपणे करून घेतल्या. स्वतः हजर राहून लक्ष देऊन त्यांनी धार्मिक विधी नीटपणे पार पडले.
आगगाडीचा प्रवास
मुंजीची नवलाई संपली. मुंज झाल्यावर एके दिवशी रवींद्रनाथांच्या वडिलांनी त्यांना विचारले या,’आपण बाहेर प्रवास करायला जाऊ या का ?’ ‘काय म्हणता ?’आपण काय ऐकले यावर रवींद्रनाथांचा विश्वास बसेना.ते आश्चर्यचकित होत म्हणाले. वडील म्हणाले आपण शांतिनिकेतन ला भेट द्यायची.नंतर आपण इतर ठिकाणांना भेटी द्यायच्या.’वडिलांचे बोलणे ऐकून रवींद्रनाथांना आकाश ठेंगणे वाटू लागले. आतापर्यंत त्यांनी शांतिनिकेतनबद्दल खूप ऐकले होते. सत्याने त्यांना वर्णन करून सांगितले होते. परंतु आता प्रत्यक्ष शांतिनिकेत आपल्याला पाहायला मिळणार,याचा त्यांना आनंद होत होता अखेर तो आनंदाचा दिवस उगवला. रवींद्रनाथांना बरेच नवीन कपडे घालायला मिळाले.रवींद्रनाथांना तर आगगाडीची भीती वाटत होती.सोमेनदादाने त्याना भीती घातली होती मात्र, रवींद्रनाथांना आगगाडीचा प्रवास भीतीचा किंवा धोक्याचा न वाटता,खूप आनंदाचा वाटला. रवींद्रनाथ आणि त्यांचे वडील अगदी सुखरूपपणे शांतिनिकेतनला पोहोचले.पण तिथे जाईपर्यंत सायंकाळ झाली होती.
शांतिनिकेतन
जे पाहण्याची रवींद्रनाथांना खूप उत्सुकता लागून राहिली होती, ते शांतिनिकेतन आता प्रत्यक्ष समोर होते. शांतिनिकेतनचे अतिशय अद्भुत आणि सुंदर वातावरण रवींद्रनाथांना भलतेच आवडले. दोन्ही बाजूला असलेल्या भरपूर दाट झाडांमुळे पाऊस किंवा उन्हाचा त्रास होत नव्हता. शांतिनिकेतनमधील ते निसर्गरम्य वातावरण त्यांना खूप आवडले. त्या निसर्गरम्य वातावरणामुळे त्यांच्या चित्तवृत्ती बहरून येऊ लागली. त्यांना तेथे कविता लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. अशा काव्यरचना करीत असताना रविंद्रनाथांना त्यांच्या चुलत भावाचे चांगले मार्गदर्शन लाभले आणि मदतही झाली.
रवींद्रनाथ टोपणनावाने कविता करू लागले
रवींद्रनाथांच्या काव्यरचना खूप सुंदर होत्या. कोणालाही त्या कविता आवडण्यासारख्याच होत्या. परंतु इतक्या लहान वयात एवढ्या सुंदर कविता ते करतात,यावर कोणाचा विश्वासच बसत नसे.म्हणून रवींद्रनाथांनी एक नवीनच शक्कल लढवली. रवींद्रनाथांच्या कविता भानुसिंहाच्या नावावर प्रसिद्ध होऊ लागल्या,पण खरी गोष्ट काही जवळच्या लोकांना माहीत होतीच.इतर लोक भानुसिंहाच्या कविता म्हणून रवींद्रनाथांच्या कविता अनुभवत होते. पण तरीही रवींद्रनाथांची प्रतिभा शक्ती आणि बुद्धिमत्ता लपून राहण्यासारखी नव्हती. लोक त्यांच्या कवितांनी आश्चर्यचकित होत असत.
वेगळी जडण घडण
रवींद्रनाथांचे घराणे नावाजलेले होतेच. सुशिक्षित आणि कलाप्रेमीही होते. शिक्षणाचा वारसाच जणू घराण्याला मिळाला होता. सहाजिकच अशा कीर्तिवान घराण्यात जन्मलेले रवींद्रनाथ, इतरांसारखेच खूप शिकतील अशीच सर्वांची कल्पना होती. निसर्गवेड्या रवींद्रनाथांनी निसर्गालाच आपला गुरु मानले होते. शाळेतील धडे गिरवण्याऐवजी ते निसर्गाचे धडे गिरवू लागले होते. त्यांनी खूप शिकावे, असे घरातल्या मंडळींना वाटायचे. खूप प्रयत्न केले.पण सगळे प्रयत्न वाया गेले. रवींद्रनाथांचे शिक्षणात मन लागतच नव्हते. लौकीक अर्थाने रवींद्रनाथ खूप शिकले नाही तरी, त्यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले होते. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व फार चांगले घडले होते. सुसंस्कृतपणा त्यांच्या वागण्या बोलण्यात उठून दिसत होता. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ भले गृहस्थ होतेज्ञान,संस्कृती आणि अध्यात्म यांचे जणू ते प्रतीक होते. रवींद्रनाथांसाठीही त्यांनी कसूर केली नव्हती. त्यांनी पुढील शिक्षणासाठी त्यांना इंग्लडला देखील पाठवले होते. पण ते कोणतीही पदवी न मिळविता तसेच भारतात परतले होते.त्याचे सर्व बंधू एकमेकांशी प्रेमाने वागायचे.ज्योतिदादाने रवींद्रनाथांना अनेक गोष्टी शिकविल्या होत्या. निसर्गवेड्या रवींद्रनाथांना त्याने पियानो वाजवायला शिकविले. तसेच गायन करायलाही शिकविले. घोडेस्वारी आणि शिकार कशी करावी याचेही धडे दिले.पण कोमल वृत्तीच्या रवींद्रनाथांना शिकार करायला कसे आवडणार ?शिकार करणे त्यांना मान्य नव्हते. मुक्या प्राण्यांना पकडणे,जखडून ठेवणे किंवा मारणे हे त्यांच्या मनाला अजिबात पटत नसे. असे प्रेमळमनाचे,प्राण्याची हत्या करायला कसे धजावणार ?त्यांनी तो नाद सोडून दिला. आपण कोणाला जीवन देऊ शकत नसलो तर, कोणाचा जीव घेण्याचा अधिकार आपणास नाही, या विचारांचे रवींद्रनाथ होते.
दिव्यत्वाचा साक्षात्कार
रवींद्रनाथांच्या आईचे नाव शारदादेवी असे होते. ते लहानपणीच मातृसुखाला पारखे झाले होते. ते लहान असतानाच शारदादेवी या जगातून निघून गेल्या होत्या. घरात वाहिनी होत्या. त्यांचे नाव कादंबरीदेवी त्यांनीच रवींद्रनाथांना मातेची माया दिली. न्हाऊमाखू घातले. प्रेमाने वाढवले. कादंबरीदेवीच्या प्रेमाला कृपा छत्राखालीच ते लहानाचे मोठे होऊ लागले. या कादंबरीदेवी बुद्धिमान आणि रसिक मनाच्या होत्या. त्यामुळे आपल्या निसर्गवेड्या दिराचे त्यांना फार कौतुक वाटायचे.या वहिनींनी रवींद्रनाथांना आईची उणीव कधी भासू दिली नाही. रवींद्रनाथांनी इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व मिळविले होते. ते इंग्रजीमधून लिहू शकत होते. पण मातृभाषेवर त्यांचे खूप प्रेम होते. आपले लिखाण ते बंगाली भाषेतून करीत असत.
असेच एकदा रवींद्रनाथ नेहमीसारखे सकाळी उठले. पूर्व दिशेला तोंड करून ते उभे होते. तितक्यात पूर्वेला वेगळेच काही दिव्या असे दिसले. सूर्यबिंब हळूहळू वर येत होते. त्याच्या किरणांनी सृष्टी व्यापू लागली होती. उजेड फाकू लागला होता. त्या उजेडात रवींद्रनाथांना नेहमीचेच जग अधिक प्रकाशमान वाटले होते. रवींद्रनाथांना जे वेगळे अनुभवले, तेथेच त्यांना दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला होता. दिव्यत्वाचे दर्शन घडले होते आणि त्याच वेळेपासून रवींद्रनाथांचे जीवन खूप बदलून गेले. प्रकाश, सौन्दर्य आणि आंनद हेच त्यांना जिथे तिथे दिसू लागले. त्या दिव्यत्वाने त्यांचे जीवन आमूलाग्र बदलले.
विवाहबंधन
रायचौधरी हि नावाजलेली असामी होती. त्यांच्या मुलीचे नाव भवतारिणी असे होते. ती होती अकरावर्षाची. तिचा आणि रवींद्रनाथांचा विवाह घडून आला. फारसा बडेजाव न मिरविता हे लग्न अगदी साधेपणाने पार पडले.विवाहानंतर भवतारिणीचे नाव मृणालिनी असे ठेवण्यात आले. ह्या मृणालिनी काही फारशा सावरल्या नव्हत्या. पण लग्नानंतर रवींद्रनाथांनी स्वतःच त्यांना संस्कृत आणि इंग्रजी शिकवून तयार केले. संसारात पडल्यावर काय होते ,ते रवींद्रनाथांनाही कळून येऊ लागले. आतापर्यंत निसर्ग आणि साहित्य विश्वात रमलेल्या रवींद्रनाथांना, आता संसारातल्या अडीअडचणींचाही सामना करावा लागत होता. वहिनी कादंबरीदेवीनी रवींद्रनाथांना मातेची ममता दिली होती. त्या कादंबरीदेवी रवींद्रनाथांच्या विवाहानंतर काही महिन्यातच देवाघरी गेल्या.आतापर्यंत आनंदी आणि शांततेने जीवन जगणाऱ्या रवींद्रनाथांना जीवनात खळबळ माजली. त्यांचे मन आरपार ढवळून निघाले.
काव्य फुलू लागले
हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात, तसेच मानवी जीवनालाही अनेक पैलू असतात. रवींद्रनाथ तसे विचारी होते. ते अनेक विषयांवर विचार करीत. विचारांमुळे त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. प्रत्येक विषयांचे भरपूर वाचन केल्यामुळे, जीवन मृत्यू यांचे खरे स्वरूप त्यांना कळले होते. जीवनातील वेगवेगळे अनुभव घेतल्यावर रवींद्रनाथांना एकांतवास फार आवडू लागला. हा एकांतवास शोधण्यासाठी त्यांनी खूप भ्रमंतीही केली. अनेक ठिकाणांना भेटी दिल्या.
नवा अनुभव
रवींद्रनाथ असे काव्य, चिंतन आणि मनन करण्यात गढले असता,एके दिवशी त्यांच्या वडिलांनी जवळ बोलावीत म्हटले,’रवी, आपल्या वाडवडिलांनी मिळवलेली आणि आजपर्यंत सांभाळून ठेवलेली इस्टेट खूप मोठी आहे. आता तू आपल्या इस्टेटीच्या कारभाराकडे लक्ष देत जा, म्हणजे झाले. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे वागण्याचे रवींद्रनाथांनी ठरविले . वडिलांचे सांगणे कसे नाकारणार? पण त्यांना काळजी वाटू लागली कि, आपण जर घरच्या कारभाराकडे लक्ष घातले तर आपले आवडते काव्य मागे तर पडणार नाही ?रवीला काव्याची आवड आहे,त्यात तो हुशार आहे.परंतु व्यवहारी जग कसे असते याचा अनुभव रवीला यावा ,म्हणूनच त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर हि नवीन जबाबदारी सोपवली होती. रवींद्रनाथ आता इस्टेटीचे कामकाज पाहू लागले. त्यांनी सियाल्डा येथे राहण्यास सुरुवात केली. तेथे त्यांचा मोठा जमीन जुमला होता.
इस्टेटीच्या या नव्या कामात रवींद्रनाथ रमून गेले. मुळात निसर्गात रमणाऱ्या रवींद्रनाथांना ते वातावरण खूप आवडले होते. स्वच्छ सूर्यप्रकाश, पाण्याचा खळाळता प्रवाह,पायाला मऊशार लागणारी माती, रानफुलांचा दरवळणारा सुगंध हे त्यांना खूप अप्रूप आणि सुखकारक वाटू लागले. शहर सोडून ते खेड्यात आले होते. खेड्यातले नैसर्गिक वातावरण, तिथले भोळे भाबडे लोक, त्यांच्या विचारांच्या पद्धती,त्यांची राहणीमान याबद्दल त्यांच्या मनात अनेक विचार आले.त्यांनि त्या खेडूत जीवनाकडे सूक्ष्म दृष्टीने पहिले. यामुळेच त्यांच्या लिखाणात खेडूत जीवनाचे नेमके आणि स्पष्ट चित्र उमटलेले दिसते. त्यांच्यामुळे कथाकथनाला एक झळाळी आणि प्रतिष्ठा लाभली. म्हणून रवींद्रनाथांना बंगाली कथेचे जनक अशी सार्थ कीर्ती प्राप्त झाली.
मला जगायचे ते भारतासाठी
टागोर घराण्याचे इस्टेट फारच मोठी आणि दूरवर पसरलेली होती. सगळीकडे लक्ष पुरवणे, चोख हिशोब ठेवणे हे बरेच अवघड आणि कठीण काम होते. हिशेब लिहिणारी कारकून मंडळी कामात अळंटळंम करीत असत. कामात त्यांचे फारसे लक्ष नसे. परंतु रवींद्र नाथांना जशी निसर्गाची ओळख होती,त्याचप्रमाणे ते मनुष्य स्वभावदेखील ओळखून होते. कामचुकार मंडळींना त्यांनी वठणीवर आणून कामाला लावले. त्याकाळी शेती पारंपरिक पद्धतीने करीत असत. त्यामुळे शेती किफायतशीर होत नव्हती. म्हणून शेती करण्याच्या पद्धतींत काहीतरी बदल घडवावा, असे रवींद्रनाथांना वाटत असे. रवींद्रनाथांनी शेती विषयावरची अनेक नवनवीन पुस्तके मागवून घेतली. सुधारलेल्या पद्धतीने शेती कशी करावी, याचा अभ्यास केला आणि शेती करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. खेड्यातील गरीब जनतेची हालाखीची स्थिती पाहून,त्यांच्या उद्धारासाठी काहीतरी करावे,असे त्यांना वाटू लागले आणि मनातील विचार त्यांनी कृतीत आणायला सुरुवात केली. त्यांनी आपली ऐषारामी जीवनपद्धती बदलायचे ठरवले. परकीय पोशाख घालण्याचे सोडून दिले. ते भारतीय पद्धतीचा पेहराव करू लागले. भारतीय कारागिरांनी बनवलेल्या गोष्टींना मागणी वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. स्वदेशीचा प्रचार व्हावा म्हणून त्यांनी स्वदेशी भांडार सुरु केले. स्वदेशी भाषांचा वापर प्रत्येक व्यवहारात करावा,असे त्यांनी सर्वानी कळकळीचे आवाहन केले.
ते म्हणायचे,’मला आत्ता सुख-संपत्ती असे काही नको. ते क्षणभंगुर सुख मी अनुभवले आहे. ते खरे सुख नाही. माझे जीवन आता माझ्या देशासाठी व्यतीत करायचे आहे.
विश्वभारतीसंस्था
देशासाठी जगायचे, असे एकदा ठरवल्यावर रवींद्रनाथ त्या दृष्टीने काम करू लागले. रवींद्रनाथांनी शांतिनिकेतनामध्ये विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली. साहित्य,कला आणि संशोधन याबाबतचा अभ्यास उच्च दर्जाचा असावा, असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी विश्व भारतीमध्ये तशीच सुविधा निर्माण केली होती. त्यासाठी कितीही कष्ट पडले, कितीही त्याग करावा लागलं तरी त्याला त्यांची तयारी होती. शांतिनिकेतन मधील शैक्षणिक सुविधांची,तेथील उच्चप्रतीच्या शिक्षणाची माहिती सर्वाना व्हावी,म्हणून त्यांनी शांतिनिकेतन हे छोटेखानी नियतकालिक सुरु केले. रोपट्याचा विशाल वृक्ष व्हावा,तसे हळूहळू विश्वभरतीचे रूप विशाल झाले. चिरंतन सत्याच्या शोधासाठी माणसाच्या आत्म्याचा अभ्यास करणे, हे विश्वभरतीचे उद्दिष्ट ठरले. रवींद्रनाथांना जगाची चांगलीच ओळख होती. जे जे सुंदर ते माणसाचे लक्ष वेधून घेते.जे जे जीवनोपयोगी त्याचाही अंगीकार माणूस करतो. रवींद्रनाथांना हे सर्व माहित होते. जीवन घडविणाऱ्या सर्व कलाना,उपक्रमांना,कार्यक्रमांना आपल्या शिक्षण संस्थेत स्थान असावे असे त्यानं वाटत असे.त्याप्रमाणे त्यांनी असे विविध उपक्रम सुरु केले होते. अनेक कामाच्या व्यापात गुंतून पडले,तरी रवींद्रनाथांची प्रतिभाशक्ती सदैव जागृत होती. काव्य करणे हाही त्यांचा ध्यास होता आणि मग जगानेच जणू रवींद्रनाथांच्या काव्याचा गौरव केला. त्यांनी लिहिलेल्या ‘गीतांजली’ या बंगाली भाषेतील काव्याला जगातील प्रतिष्टेचे, मानाचे समजले जाणारे नोबेल पारितोषिक मिळाले. असा सन्मान मिळणे हे थोर भाग्य. ते रवींद्रनाथांना लाभले. असा सन्मान मिळविणारे यूरोपबाहेरील ते पहिलेच साहित्यिक होते. कलकत्ता विद्यापीठानेही त्यांचा गौरव केला. डी.लिट. हि पदवी त्यांना बहाल केली.
रवींद्रनाथांचे साहित्य
रवींद्रनाथांच्या अखंड प्रयत्नाने विश्वभारती संस्था नावारूपाला आली. शांती आणि प्रेम म्हणजे विश्वभारती,असेच समीकरण झाले होते काव्य आणि कथा याबरोबर त्यांनी नाटक कादंबऱ्याही लिहिल्या. नौकाडूची, चतुरंगी या कादंबऱ्या आणि मुकधारा, निसर्गाचा सूड अशी नाटकेही त्यांनी लिहिली.पोस्ट ऑफिस हे त्यांचे नाटक खूप गाजले.तशाच त्यांच्या अनेक कादंबऱ्याही गाजल्या. एके दिवशी विचार करीत असता,त्यांनी आपल्या जीवनाकडे मागे वळून पाहिले आणि मग आपल्या आठवणी लिहून काढल्या. त्या लेखन रूपाने पुढे प्रसिद्ध झाल्या.
जीवन नौका पैलतीरी
रवींद्रनाथांना लोक आता गुरुदेव म्हणून ओळखू लागले होते. देशाच्या स्थितीबद्दल त्यांना काळजी वाटत असे. लो. टिळक, म.गांधी., पं. नेहरू, या पुढाऱ्याबद्दल त्यांच्या मनात प्रेमाची भावना होती.ते करीत असलेल्या देशसेवेच्या कार्याबद्दल त्यांना आदर वाटत होता. गांधीजीनाही रवींद्रनाथांबद्दल खूप आदर होता. तेही त्यांना’गुरुदेव’ या नावाने संबोधित. हळूहळू रवींद्रनाथांचे वय वाढत होते. अधून मधून ते आजारी असायचे. पण बरे वाटू लागताच पुन्हा कामाला सुरुवात करायचे. त्यांनी ‘विश्वपरिचय ‘हे पुस्तक लिहून काढले. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांचा डॉक्टरेट हि पदवी देऊन गौरव केला. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावू लागली. अखेर ७ऑगस्ट १९४१ या दिवशी निसर्गवेडे रवींद्रनाथ या जगातून कायमचेच निघून गेले. अशा गुरुदेव रवींद्रनाथांना शतशः प्रणाम.
Shantiniketan Ravindranath Tagore|शांतिनिकेतन रवींद्रनाथ टागोर
हे पण वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनप्रवास