भारत मातेच्या सुपुत्रांपैकी एक होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर . सावरकरांचे घराणे मुळचे कोकणातले त्यांचे पूर्वज कोकण सोडून देशावर नाशिकला आले. आपल्या कर्तबगारीने घराण्याचा नावलौकीक वाढवला. अशा घराण्यात नाशिकजवळील भगूर या गावी २८ मे १८८३ या दिवशी विनायक सावरकरांचा जन्म झाला.

Biography of Swtantryaveer Sawarkar |स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनप्रवास
लहान वयात कठोर प्रतिज्ञा
विनायकाचे वडील दामोदर पंत विद्वान, स्वाभिमानी आणि करारी स्वभावाचे होते. ते इंग्रजी शिकलेले असले तरी धार्मिक वृत्तीचे,भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते.त्यांची आई राधाबाई या धार्मिक आणि सात्विक वृत्तीच्या गृहिणी होत्या. विनायकांना दोन भाऊ व एक बहीण होती. आई-वडील सर्वाना प्रेमाने वाढवीत होते. आपल्या मुलानी चांगले शिकावे,अभ्यास करावा, सुसंकृत व्हावे असे त्यांना वाटे. विनायक सहा वर्षाचे झाले. वडिलांनी त्यांचे नाव शाळेत दाखल केले. लवकरच ते आपल्या बुद्धीची चमक दाखवू लागले. लहान वयातच त्यांना वाचनाचा छंद जडला. ते तासनतास अभ्यास करायचे. त्यांची बुद्धी तल्लख होती.लहानपणीच ते घोडेस्वारी करायला आणि धनुष्यबाण चालवायला शिकले होते. विनायक दहा वर्षाचे असतानाच त्यांची आई राधाबाई स्वर्गवासी झाल्या.
माणसाच्या जीवनात कधी-कधी विलक्षण प्रसंग घडतात. त्यामुळे माणसाच्या जीवनात मोठा बदल घडून येतो. विनायकांच्या मनावरही खोल ठसा उमटविणारी एक घटना घडली. आपल्या देशात त्यावेळी भयानक घडामोडी घडत होत्या. महाराष्ट्रात दुष्काळाने आणि प्लेग या महाभयानक रोगाने थैमान घातले होते. प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी इंग्रज सरकारने जे उपाय योजले होते, त्यामुळे प्लेग राहिला बाजूलाच,परंतु लोकांचा मात्र भयंकर छळ होऊ लागला. लोकांना घरातून हाकलून अशा ठिकाणी पाठवले जाई कि, तेथे कसल्याही सोयी सुविधा नव्हत्या. प्लेगचा संसर्ग होऊ नये म्हणून लोकांच्या घरादाराला आगी लावल्या जात. गोरे शिपाई स्त्रियांवर अत्याचार करीत. प्लेग परवडला पण हा सरकारी छळ नको,असे लोक म्हणू लागले. हा अत्याचार पाहून पुण्यातला चाफेकर बंधू ची माथी भडकली. या अत्याचाराला जबाबदार असणारा इंग्रज अधिकारी रँड साहेब याला त्यांनी गोळ्या घालून ठार केले. चाफेकर बंधूना इंग्रजानी पकडले आणि फाशीची शिक्षा ठोठावली. चाफेकरांनी हातात गीता घेतली आणि देशासाठी ते फाशी गेले. या घटनेचा खोल परिणाम विनायकांवर झाला. ते तडक देवघरात गेले. देवाची प्रार्थना करीत त्यांनी एक कठोर प्रतिज्ञा केली.म्हणले’मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सतत झगडत राहीन . मायभूमीतून इंग्रजांना हाकलून लावीन. तिला स्वातंत्र्य आणि श्रेष्ठत्व प्राप्त करून देईन.
मित्रमेळा
विनायकांमध्ये देशभक्ती बरोबरच संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जाण्याचेही गुण दिसून येत होते. गावात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला,तेंव्हा माणसे पटापट मरू लागली. या प्लेगने विनायकाचे जीवन सुद्धा दुखी केले. त्यांचे वडील आणि चुलते प्लेगला बळी पडले.लहान भाऊ नारायण हेही प्लेगने आजारी पडले. थोरले भाऊ बाबाराव यांनी जीवापाड सेवा करून नारायणांना वाचविले. भागनूरच्या शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर विनायक पुढील शिक्षणासाठी नाशिकला गेले. नाशिकच्या हायस्कूल मध्ये शिकत असतानाच अभ्यासाबरोबर ते लिखाण करू लागले. त्यांचे सखोल ज्ञान आणि त्यांच्या वक्तृत्व गुणांनी त्यांचे गुरुजन भारावून गेले.
त्यांनी नवे मित्र मिळविले.ते देशप्रेमी होते. टिळकांच्या देशभक्तीच्या विचारांनी ते भारावून गेले होते. मग या सर्वानी अनेक गुणी आणि कर्तृत्वशील तरुणांची एक फळी उभारून १९००सालाच्या प्रारंभाला ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना केली. मग अनेक ठिकाणी मित्रमेळा संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. राष्ट्रीय विचाराच्या तरुण मुलांची एक फळीच यामुळे निर्माण झाली. तरुण विनायक त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत चेतावण्याचे काम करू लागले. आजूबाजूच्या काही उनाड परंतु बुद्धिमान तरुणांनाही,विनायकानी आपल्या विचारांनी स्वतः कडे आकर्षित करून घेतले. देश भक्तीचे विचार त्या तरुणांच्या अंतःकरणात रुजविले. त्यांच्यातील सुप्त गुणांना योग्य वळण देऊन,देशभक्तीच्या मार्गावर आणले. वीर आणि साहसी विचारांच्या तरुणाची एक गट त्यांनी निर्माण केला.
भाषणबाजी नव्हे प्रत्यक्ष कृती
विनायक आता मांत्रिकाचा अभ्यास करीत होते. आई-वडिलांचे अकाली निधन झाल्याने,सर्व भावंडांची जबाबदारी विनायकाचे मोठे भाऊ बाबारावांवर पडली होती. विनायकाच्या पुढील शिक्षणाची त्यांना चिंता लागली होती. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. भाऊराव चिपळूणकर नावाचे एक सधन गृहस्थ सावरकर कुटुंबियांना चांगले ओळखत होते. त्यांनी आपल्या मुलीशी विनायकाचा विवाह करून दिला आणि सांगितले कि, शिक्षणाच्या खर्चाची काही काळजी करू नका.विनायक मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर सर्वजण त्यांना ‘विनायक सावरकर ‘ म्हणून ओळखू लागले. सावरकारांनी पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याचा महाविद्यालयात सावरकरांनी देशभक्तीपर क्रांतिकारक विचारांचा प्रसार करण्याचे कार्य सुरु केले. अनेक तरुण त्यांचे मित्र बनले. तेथे सावरकर गट स्थापन झाला. महाविद्यालयाच्या सर्व कार्यक्रमांवर या गटाची छाप पडली. या गटाने एक साप्ताहिक सुरु केले. सावरकर यातून देशभक्तीपर विचारांचे लेख लिहू ललागले. वर्तमानपत्रातूनही त्यांचे लेख प्रसिद्ध होत होते.
महाविद्यालयाच्या समारंभात सावरकर देशभक्तीपर हृदय हेलावून टाकणारी भाषणे देऊ लागले. ती भाषणे ऐकणारे देशप्रेमाने भारून जात. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेण्यासाठी तरुणांची मने पेटून उठू लागली. सावरकर जसे बोलत,तशीच कृती करीत असत. ते नेहमी स्वदेशी पोशाख करीत असत. पुण्यातील अनेक सार्वजनिक कार्यात ते पुढाकार घेत असत. काही वेळा सावरकर लो.टिळकांनाही भेटत असत. आपल्या विचारांनी सावरकरांनी पुण्यातील जनतेची मने जिंकली होती. सावरकरांनी परदेशी इंग्रजी मालावर, कपड्यांवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन करायचे ठरवले. यासाठी त्यांनी टिळकांचे आशीर्वाद घेतले. सावरकरांनी देशात प्रथमच परदेशी कापडाची होळी पुण्यात पेटवली. सर्व भारतभर हि बातमी पसरली. इंग्रज सरकारविरुद्ध देशभर असंतोष उत्पन्न झाला यावेळी सावरकर अवघे बावीस वर्षाचे होते. परंतु या कृत्यामुळे लवकरच त्यांना, एक संकटाचा सामना करावा लागला. इंग्रज सरकरविरुद्ध भाषण व कृती केल्याबद्दल त्यांना, कॉलेजच्या वसतिगृहातून काढून दहा रुपये दंडाची शिक्षा केली.
अभिनव भारत
सावरकरांनी पुण्यात परदेशी कापडाची होळी धडाडून पेटवली. ते पाहून लोक मान्य टिळक म्हणाले,’ हि होळी फक्त परदेशी कपडेच जळणार नाही,तर इंग्रजांचे साम्राज्य यात जाळून भस्मसात होईल.’ टिळकांच्या अशा उदगारामुळे सावरकरांना आणखी बळ मिळाले. एके दिवशी एका घरात सावरकर आणि त्याची मित्र मंडळी जमली. ते सर्व तरुण म्हणजे रोमारोमात देशाभिमान भिनलेले हलते बोलते दाहक निखारेच होते. ते सर्व एका विचाराने भारलेले तरुण होते.मध्यभागी एक चौरंग मांडला होता. शेजारी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणाप्रताप यांच्या प्रतिमा होत्या. मध्यभागी गणेशाची प्रतिमा होती. सर्व प्रतिमांना फुलांचे हार घातलेले होते. सावरकर उभे राहत म्हणाले,’आपण आजपासून आपल्या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ या संस्थेत करणार आहोत. या संस्थेचा प्रत्येक सभासद आज हि प्रतिज्ञा करेल’ आपल्या पवित्र धर्मावर,छत्रपती शिवरायांच्या नावावर, आपल्या पवित्र देशासाठी,महान पूर्वजांची शपथ घेऊन मी प्रतिज्ञा करतो की, आपला देश संपूर्ण स्वतंत्र होण्यासाठी, मी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करिन. यात मी आळस करणार नाही. माझ्या उद्देशापासून तीळमात्र मागे हटणार नाही. मी संस्थेच्या सर्व नियमांचे पालन करीन.’जमलेल्या सर्व तरुणांनी एकामागून एक अशी उभी राहून प्रतिज्ञा केली.
सावरकरांना आता क्रांतिकारी विचारसरणीचे,ज्वलंत देशाभिमान असलेले तरुण म्हणून सर्वजण ओळखू लागले. अनेक तरुण अभिनव भारत संघटनेचे सभासद झाले. लवकरच सावरकर बी.ए. पास झाले..नंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरु केला.
उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना
त्या काळी परदेशात शिकायला जाणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. सावरकरांना परदेशी जाऊन बॅरिस्टर व्हावे,असे वाटत होते. यामध्ये त्यांचा दुसरा आणखी एक हेतू होता. शिक्षणाबरोबरच परदेशात भारताच्या स्वतंत्रलढ्याचा प्रचार करणे,त्यासाठी मदत मिळवणे, जीवावर उदार होऊन स्वतंत्रप्राप्तीसाठी झटणारे तरुण सहकारी मिळविण्याचे,त्यांचे मनातील विचार होते. लंडन मधील पं.श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सावरकरांना,लंडन मधील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली.त्यात एक अट होती.मी अशी शपथ घेतो कि,’मी इंग्रजी सरकरची कोणतीही नोकरी स्वीकारणार नाही.’सावरकरांनी हसतच हि अट मान्य केली. लो.टिळक आणि नाशिकच्या जनतेचा निरोप घेऊन,सावरकर परदेशी जाण्यासाठी मुंबई बंदरात आले. त्यांची पत्नी,मुलगा आणि इतर कुटुंबीय त्यांना निरोप देण्यासाठी हजर होते. बोटीवर हरनामसिंग या तरुणाची सावरकरांशी ओळख झाली. पहिल्याच भेटीत तो सावरकरांचा कट्टर अनुयायी झाला. लंडन ला पोहोचल्यावर सावरकर इंडिया हाऊस मध्ये उतरले. भारतातून शिक्षणासाठी लंडन ला येणारे विद्यार्थी आणि इतर पाहुणे,यांच्यासाठी राहण्याची आणि जेवण-खाण्याची व्यवस्था,काही अटींवर पं.श्याम कृष्ण वर्मानी केली होती. शिक्षणाचे बस्तान बसल्यावर, सावरकरांनी ‘फ्री इंडिया सोसायटी’ नावाची एक संस्था तेथे सुरु केली. परदेशातील भारतीय विद्यार्थांची संघटना तयार करून, देशभक्ती तयार करण्याचे कार्य सावरकरांनी सुरु केले.
त्यांनी अनेक अनुयायी मिळवले. यामध्ये लाला हरदयाळ,भाई परमानंद, मॅडम कामा, सेनापती बापट, मदनलाल धिंग्रा, अय्यर शुक्ल अशी किती नावे सांगावीत. हे सर्वजण उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात आले होते. परंतु सावरकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, त्यांनी देशकार्याला वाहून घेतले. लंडन मध्ये सावरकरांनी कार्य सुरु केल्यानंतर भारतात इंग्रज लोक,येथील लोकांना कसे छळतात,अत्याचार करतात हे सांगायला सुरुवात केली. भारतीय जनतेचे गाऱ्हाणे,त्यांनी जगाच्या वेशीवर टांगायला सुरुवात केली. फ्री इंडिया संस्थेच्या बैठक भरत. शिवाजी महाराज,गुरुनानक,गुरु गोविंदसिंग यांचे स्मुतीदिन साजरे करीत. दसऱ्याचा उत्सवही साजरी करीत. अशाप्रकारे सावरकरांनी इंग्लड मधेच इंग्रजांच्या छाताडावर उभे राहून,भारताची बाजू भक्कम पणे मांडायला सुरुवात केली.
पहिला घाव घातला
सावरकरांच्या क्रांतिकारी विचारांचा जोरदार प्रसार होऊ लागला. पुस्तके,पत्रिका आणि देशभक्त मॅझिनीच्या शिकवणुकीचा, भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर खूप मोठा प्रभाव पडला होता. सावरकरांनी मॅझिनीचे चरित्र मराठीत लिहून तो ग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथाने महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवली. शिखांच्या इतिहासावरील पत्रके काढून, देशप्रेमाने भरलेली,कर्तव्याची जाणीव करून देणारी ती पत्रके त्यांनी शीख सैनिकात वाटली. यामुळे इंग्रज सरकार अस्वस्थ होऊ लागले. अशातच १ मे १९०७ हा दिवस उजाडला. १८५७ साली भारतात स्वातंत्र्यप्रेमी वीरांनी इंग्रज सरकारविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध छेडले होते. पण त्यात त्यांना यश आले नाही. इंग्रजांनी या देशभक्त वीरांना बंडखोर ठरविले होते. भारतीय स्वात्नत्र्ययोध्याचा असा अपमान लंडन मधील भारतीय तरुणांना सहन झाला नाही. म्हणून सावरकरांनी १८५७ मधील स्वातंत्र्य वीरांचा गौरव करण्यासाठी,त्यांचा स्मृतिदिन अभिमानाने साजरा केला. लोकांना खरा इतिहास कळण्यासाठी सावरकरांनी खूप अभयस केला. त्यांनी एक ग्रंथ लिहिला. त्याचे नाव ‘१८५७चा स्वातंत्र्य संग्राम ‘. त्यामुळे खरा इतिहास जगातील लोकांना कळला आणि इंग्रज सरकराचे पितळ उघडे पडले. काही भारतीय क्रांतिकारक स्फोटक द्रव्ये जमवून, त्याची गुप्तपणे ठराविक ठिकाणी पाठवणी करण्यात गुंतले होते. पुस्तकामध्ये पिस्तुले लपवून ती गुपचूपपणे भारतात पाठवीत होते.
इंग्रजांनी भारतात चालवलेले अत्याचार, जुलूम, दडपशाही शिगेस पोहोचली होती. काहीतरी कृती केली पाहिजे, असे सावरकरांना वाटत होते. त्यावेळी मदनलाल धिंग्रा नावाचे तरुण सावरकरांपुढे उभा राहत म्हणाले,’ मी माझ्या मातृभूमीसाठी बलिदान करायला तयार आहे.’ इंग्रज सरकारने भारतात केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्याचे धिंग्रानी ठरवले.सर कर्झन वायलीने,बंगालच्या फाळणीच्यावेळी भयंकर अत्याचार केले होते. म्हणून धिंग्रानी लंडनमध्ये कर्झन वायलीचा गोळ्या झाडून वध केला. त्यामुळे सारे लंडन हादरून गेले. धिंग्रांना पकडण्यात आले. या घटनेमुळे जिकडे-तिकडे भारत हाच चर्चेचा विषय बनला.
इंग्रज भिऊ लागले
मदनलाल धिंग्रानी मायभूमीवर अत्याचार करणाऱ्या इंग्रजांना धडा शिकविला. त्यामुळे इंग्रज लोक सावरकरांना फार घाबरू लागले. सावरकरांचे नाव कानी पडताच इंग्रजांचा थरकाप उडत होता.धिंग्रांना इंग्रज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. आणि देशप्रेमी क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा हे भारतमातेचे सुपुत्र भारतमातेला स्वतंत्र करण्याच्या प्रयत्नात हसत हसत फाशी गेले. सावरकर बॅरिस्टरीची परीक्षा पास झाले. परंतु इंग्रज सरकारने त्यांना बॅरिस्टरीची सनद देण्यास नकार दिला. सावरकर इंग्रज लोकांच्या डोळ्यात सलू लागले. भारतात सावरकरांचे कुटुंबीय,त्यांचे अनुयायी,मित्र यांचा इंग्रज सरकारने छळ सुरु केला. सावरकरांचे बंधू बाबारावांवर राजद्रोहाचा आरोप ठेऊन, त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दिवसरात्र सतत काम केल्यामुळे सावरकर लंडन मध्ये आजारी पडले. त्यांच्या जीवाला धोका आहे, असे वाटून त्यांच्या मित्रांनी त्यांना पॅरिसला पाठवून दिले.इंग्रज सरकारने त्यांच्यावरही राजद्रोहाचा आरोप ठेवुन,त्यांना पकडण्याचे वॉरंट काढले. अनुयायांचा छळ होत आहे असे पाहताच,सावरकर पुन्हा लंडन ला आले. इंग्रज पोलिसांनी झडप घालून त्यांना पकडले. सावरकर म्हणजे इंग्रज साम्रज्यावरील प्राणसंकटच, असे इंग्रज सरकार मानीत होते. त्यामुळे फाशीचा दोर सावरकरांकडे जिभल्या चाटीत पाहू लागला होता. परंतु सावरकर कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास सिद्ध झाले होते. भारतात आपली कुटुंबावर काय संकटे आली असतील,याचे विचार सावरकरांच्या मनात येत होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले होते.त्यांचा मोठा मुलगा जग सोडून गेला होता. त्यांचे बंधू बाबाराव जन्मठेपेची शिक्षा भोगायला अंदमानात गेले होते. लहान भाऊ नारायणरावांनाही पकडले होते. तर स्वतः सावरकर लंडनच्या तुरुंगात बंद होते. सावरकरांनी आपल्या कुटुंबाची अशी वाताहत कोणत्या कारणामुळे झाली,हे आपल्या वहिनीला पत्र लिहून कळविले.
लंडनच्या न्यायालयाने सावरकरांवर खटला चालविण्यासाठी,त्यांना भारतात पाठविण्याचा निर्णय दिला. सावरकरांनीही आपल्या अनुयायांचा,ज्यांना आपल्यासाठी अपार कष्ट सोसले,मदत केली त्यांचे आभार मानीत निरोप घेतला.
सिंह जाळ्यात अडकला
सावरकरांना भारतात घेऊन येणाऱ्या मोरिया बोटीने लवकरच लंडनचा किनारा सोडला. बोटीला सावरकरांना कडेकोट बंदोबस्तात ठेवले होते. मार्गात बोटीत काही तरी यांत्रिक बिघाड झाला म्हणून दुरुस्तीसाठी बोट,फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात आली. डोक्यावर मृत्यूची टांगती तालावर असतानाही सावरकर बोटीवर मोकळेपणी हसत-बोलत होते. पण त्यांच्या मनात मात्र वेगळेच विचार चालले होते. निसटून कसे जात येईल, याचाच विचार सावरकर करीत होते.
हिच संधी आहे. पुन्हा अशी संधी मिळेल, असे वाटत नव्हते. निश्चय ठरला. ‘मला विधी करायला जायचे आहे ‘जवळच्या इंग्रज अधिकाऱ्याला सावरकरांनी सांगितले .गोरा शिपाई त्यांना बाथरूम कडे घेऊन गेला.आत गेल्यावर त्यांनी चपळाईने वरचे पोर्ट होल पकडले आणि त्या लहानशा छिद्रातून समुद्रात उडी टाकली. धडाम…. आवाज झाला. पहारेकरी सावध झाले. पळाला….कैदी पळाला.त्याने बोंब ठोकली सावरकर पोहत किनाऱ्याकडे निघाले होते. शिपाई त्यांच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडीत होते. पण नशीब बलवत्तर.गोळ्या सावरकरांच्या आसपास पडत होत्या. काही गोरे शिपाई त्यांचा पाठलाग करीत होते. अखेर सावरकर कसे-बसे किनाऱ्याला लागले.पण अखेर गोऱ्या शिपायांनी त्यांना पुन्हा पकडून बोटीवर आणले. येथे सावरकरांनी केलेला पलायनाचा हा पराक्रमी,धाडसी प्रयत्न जगभर गाजला. अखेर कडक पोलीस पहाऱ्यात एके दिवशी बोट मुंबई बंदरात आली. त्यांची रवानगी नाशिकच्या तुरुंगाकडे झाली. अशाप्रकारे भारताचा सिंह इंग्रजांच्या जाळयात अडकला.
उलटा न्याय
सावरकरांना अटक करून भारतात पाठवताच,अनेक लोकांनी इंग्रज सरकारचा निषेध केला. वृत्तपत्रांनी सरकारला धारेवर धरले. परंतु कसेही करून सावरकरांना दोषी ठरवायचेच,असा चंग इंग्रज सरकारने बांधलेला होता. मुबंईत सावरकरांवरील खटला सुरु झाला. सावरकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताच, टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले.त्यांचे अनेक सहकारी,मित्र आरोपी म्हणून दुसऱ्या पिंजऱ्यात उभे होते. त्यांनीच जागतिक कीर्तीच्या आपल्या नेत्याचे,टाळया वाजवून स्वागत केले होते. सरकारी पक्षाने सावरकरांवरील आरोप वाचून दाखविले आणि खटल्याचे नाटक सुरु झाले. अनेक खोटे साक्षीदार उभे करून सावरकर हे कसे दोषी आहेत, हे पटविण्याचा प्रयत्न सुरु झाला. बराच काळ न्यायालयाचे कामकाज चालले.अखेर न्यायालायने आपला निकाल घोषित केला, न्यायमूर्ती सावरकरांना उद्देशून म्हणाले,’विनायक दामोदर सावरकर,तुमच्यावरील आरोप इतके गंभीर आहेत कि, तुम्हाला फाशीचा द्यायला हवी.पण आम्ही तुमच्यावर दया दाखवून,तुमची सर्व मालमत्ता जप्त करून, तुम्हालाल दोन जन्मठेपेच्या सश्रम कारावासाच्या शिक्षा फर्मावित आहोत.‘
दोन जन्मठेपांची अभूतपूर्व शिक्षा. जगात आजवर असे कधी घडले नव्हते. या रानटी शिक्षा ठोठावल्या म्हणून सावरकर जराही विचलित झाले नव्हते. त्यांनी स्वतः होऊनच स्वातंत्र्याच्या होमकुंडात उडी घेतली होती. खरे तर सावरकरांना कायमचेच संपविण्यासाठी, इंग्रज सरकारने अशी भयानक शिक्षा सुनावली होती. त्या काळी अंदमानची शिक्षा म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा,असे म्हटले जात असे. एका हातात थाळी आणि लोटा,काखेत अंथरुणाची वळकटी,एका हातात बेडी,अशा थाटात सावरकरांना अंदमानाकडे पाठविण्याची तयारी झाली होती. कडक बंदोबस्तात सावरकर अंदमानाकडे निघाले होते.
नारकपुरीतील यमयातना
महाराजा बोटीतून जीवघेणा प्रवास करून सावरकरांनी अंदमानात पाय ठेवला. महाभयानक दिसणाऱ्या अंदमानातील बंदिखाण्याच्या फाटकासमोर सावरकर उभे राहिले.करकर करीत तुरुंगाचा भीषण दरवाजा उघडला. जसा तुरुंग भयानक होता,तसाच तुरुंगाधिकारी बरीसुध्दा महाभयानक होता.त्याचे नाव काढताच भयंकर खुनी गुन्हेगार सुद्धा थरथर कापत असत. त्याने कैद्यांवर इतके भयंकर अत्याचार केले होते,कि त्याच्याशी कोणाची तुलनाच होऊ शकत नव्हती. कैद्यांचा वाटेल तसा छळ करणे,हाच त्याचा छंद होता.अशा त्या यमपुरीत सावरकरानी प्रवेश केला. त्यांना ठेवलेल्या खोलीबाहेर,अत्यंत क्रूर स्वभावाचे पहारेकरी पहाऱ्याला ठेवले होते. अनेक राजकीय कैद्यांना तेलाच्या घाण्याला जुंपत असत. त्या घाण्याला जुंपत असत.त्या घाण्याला कोलू असे म्हणत. हा कोलू ओढून धिप्पाड माणूससुद्धा काही दिवसातच चिपाडासारखा होत असे. कोलू ओढून हात रक्तबंबाळ होत असत. नैसर्गिक विधी करतानाही खूप छळ होत असे. कैद्यांना साखळ दंडाला बांधून,उलटे टांगून ठेवले जाई. सुशिक्षित कैद्यांना बैलाच्या जागी, गाड्या ओढण्याचे काम करावे लागे. कैद्याला मिळणारे जेवण पहारेकरी मधल्या मध्ये फस्त करून टाकत असत. या नरकापुरीतील यमयातना भोगणे सावरकरांनाही चुकले नाही. काथ्या कुटून त्याचे हात सोलवटून,त्यातून रक्त ठिबकू लागले होते. त्यानंतर सावरकरांना कोलू ओढण्याचे काम दिले.बैलाने करण्याचे काम बॅरिस्टर सावरकर करू लागले. कोलू ओढून अतिश्रमाने ते खाली पडून बेशुद्ध झाले होते.
एवढा छळ होत असूनही,सावरकर मनाने खंबीर होते. अंदमानातील राजकीय कैद्यांना जे अधिकार असतात,ते मिळवून देण्यासाठी सावरकर प्रयत्न करू लागले. यासाठी त्यांनी बंदीवानांना शिक्षण देण्याचे काम सुरु केले. घाना ओढताना ते ज्ञानाचे धडेही देऊ लागले जमेल तेंव्हा ते बंदीवानांना उपदेशाचे चार शब्द सांगू लागले. बारीच्या विरोधाला न जुमानता,ते कैद्यांना वाचण्यासाठी पुस्तके देऊ लागले.यामुळे ज्यांना लिहिता-वाचता येत नव्हते ,ते साक्षर झाले. गुन्हेगारात सुधारणा झाली. तुरुंगातील सर्व व्यवहार उर्दू भाषेतून चालायचा. सावरकरांनी सर्वाना हिंदी भाषेतून व्यवहार करण्यास प्रवृत्त केले. सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव,हेही त्याच त्याच तुरुंगात शिक्षा भोगीत होते. बंदिवासात असताना सावरकरांना अनेक देशभक्तीपर काव्ये स्फुरत.या कविता ते काट्याने भिंतीवर लिहून ठेवीत. कविता तोंडपाठ झाली कि,भिंतीवरील कविता पुसून टाकीत. यासाठी त्यांना अनेकवेळा शिक्षाही झाल्या.
नरकपूरीतून सुटका
राजकीय कैद्यांना सोडून देण्यासाठी देशभर एकसारखा प्रचार सुरु झाला.देश परदेशातून इंग्रज सरकारला धारेवर धरण्यात येऊ लागले. सभा, विनंत्या,अर्ज आणि वृत्तपत्रातून सतत कैद्यांना सोडण्याची मागणी होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणून अनेक कैद्यांना सोडण्यात आले.पण सावरकरांची सुटका झाली नाही.शारीरिक आणि मानसिक छळ,कष्टाचे काम,अपुरे जेवण,न मानवणारे हवामान यामुळे सावरकर भयंकर आजारी पडले. त्यांच्या शरीराचा नुसता हाडाचा सापळा उरला होता. सावरकरांना सोडून देण्यासाठी इंग्रज सरकारवर दडपण वाढत होते. अखेर तो दिवस उगवला. सावरकरांची त्या नरकापुरीतून सुटका झाली. दहा वर्ष त्यांनी कठोर तुरुंगवास भोगला होता. भारतात परतल्यावर त्यांना पुन्हा तुरुंगात ठेवण्यात आले. नंतर काही अटी घालून त्यांना सोडले. पण त्यांना राजकीय कार्यात भाग घेता येणार नव्हता आणि रत्नागिरीचा परिसर सोडून, इतर ठिकाणी जाता येणार नव्हते. तुरुंगात असताना त्यांनी ग्रंथलेखनही केले.सावरकरांची सुटका होताच,सर्व देशभर आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात आले.
एक महान पर्व संपले
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारताचे स्वातंत्र्य जवळ आले. परंतु त्याचवेळी भारताची फाळणी करण्याचे कारस्थान हि शिजू लागले. सावरकरांचा देशाच्या फाळणीला प्रखर विरोध होता,. भारत अखंड राहिला पाहिजे. त्याचे तुकडे तुकडे पडू नयेत,यासाठी त्यांनी प्राणपणाने विरोध केला. पण शेवटी व्हायचे तेच झाले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत,पाकिस्तान हि दोन स्वतंत्र राष्ट्रे झाली. आपला देश स्वतंत्र झाला म्हणून एका डोळ्यात हसू,तर आपल्या मायभूमीचा तुकडा पडला,म्हणून दुसऱ्या डोळ्यात अश्रू,अशी सावरकरांची गत झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले,’आपलयाला मिळालेले स्वातंत्र, हे केवळ हौसमौज करण्यासाठी नाही.आपणाला अजुनहि खूप कष्ट करायचे आहेत.आपला देश प्रबळ आणि अजिंक्य बनविण्यासाठी अधिक शूर कृत्ये करून दाखवली पाहिजे. काळ पुढे सरकतहोता. अखंड संघर्ष, कष्ट, त्याग,तुरुंगवास याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी,उज्जवल भवितव्यासाठी पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी झुंज दिली होती. देश स्वतंत्र झाल्याचे पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले आणि आता आंनदाने मृत्यूला सामोरे जाण्याचे त्यांनी ठरवले.आपले जीवनकार्य संपल्याची जाणीव झाल्याबरोबर त्यांनी अन्न सोडले. ते फक्त पाण्यावर राहू लागले. काळ जवळ येऊन ठेपला.अखेर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी भारताचे ‘तेजस्वी पुत्र’ विनायक दामोदर सावरकर स्वर्गलोकी गेले. ज्यांना मोठेपणाची कधीही हाव नव्हती. ज्यांना खूप संपत्ती मिळवावी असेही वाटले नाही. ज्यांनी सदैव देशहिताचीच चिंता केली. राष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी संपूर्ण जीवन खर्ची घातले, देशाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिले, असे सावरकर भारतीयांना सदैव प्रेरणा, स्फूर्ती देत राहतील,यात तिळमात्र शंका नाही. त्यांच्या स्मृतीला आमचे विनम्र अभिवादन.
हे पण वाचा:- कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनप्रवास