
Biography of Karmveer Bhaurao Patil|कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनप्रवास
भाऊरावांचा जन्म
अज्ञान,अंधश्रद्धा,दुष्ट , क्रूर, रूढी-परंपरा, दारिद्रय आणि गुलामगिरी या त्रासांनी पिडलेली महाराष्ट्रातील जनता दीनवाणे जीवन जगत होती त्यातच दुष्काळ,पूर आणि साथीचे रोग हे जनतेला मरण पंथाकडे ढकलीत होते. अशा असहाय्य परिस्थितीत काही थोर महापुरुष जन्म घेतात आणि माणसावरील संकटे दूर करून त्यांना योग्य मार्गाने वाटचाल करण्यास सहाय्य करतात.
तर मुलांनो.थोर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची ओळख करून घेऊया. कर्मवीरांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील. ते सातारा जिल्ह्यातील ऐतवडे या गावाचे पाटील होते. त्यांच्या आईचे नाव गंगाबाई.
पायगोंडा पाटील सरकारी कचेरीत कारकुनाचे काम करीतअसत. सरकारी नोकरी आणि राजदरबारी चाकरी या गोष्टीला त्याकाळी फार मान असे. गंगाबाई आणि पायगोंडा पाटील यांचे जीवन तसे समाधानाने चालले होते. अशावेळी बाळाच्या आगमनाची चाहूल लागली. २२ सप्टेंबर १८८७ या शुभ दिवशी गंगाबाईच्या पोटी भाऊरावांचा जन्म झाला. पाटलांच्या घरी पुत्र झाला म्हणून सर्व गावालाच आनंद झाला.
हे बालक आजोळी कुंभोज या गावी जन्माला आले होते. बारशाचा दिवस उजाडला. बाया-बापड्या जमल्या आणि नाव ठेवले ‘भाऊ ‘. त्या बिचार्या आयाबायांना कल्पना नसेल कि, हाच भाऊ पुढे महाराष्ट्रातील जनतेचा खराखुरा ‘भाऊ’ होणार आहे.
अज्ञान,अंधश्रद्धा,दुष्ट , क्रूर, रूढी-परंपरा, दारिद्रय आणि गुलामगिरी या त्रासांनी पिडलेली महाराष्ट्रातील जनता दीनवाणे जीवन जगत होती त्यातच दुष्काळ,पूर आणि साथीचे रोग हे जनतेला मरण पंथाकडे ढकलीत होते. अशा असहाय्य परिस्थितीत काही थोर महापुरुष जन्म घेतात आणि माणसावरील संकटे दूर करून त्यांना योग्य मार्गाने वाटचाल करण्यास सहाय्य करतात.
तर मुलांनो. थोर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची ओळख करून घेऊया. कर्मवीरांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील. ते सातारा जिल्ह्यातील ऐतवडे या गावाचे पाटील होते. त्यांच्या आईचे नाव गंगाबाई.
पायगोंडा पाटील सरकारी कचेरीत कारकुनाचे काम करीतअसत. सरकारी नोकरी आणि राजदरबारी चाकरी या गोष्टीला त्याकाळी फार मान असे. गंगाबाई आणि पायगोंडा पाटील यांचे जीवन तसे समाधानाने चालले होते. अशावेळी बाळाच्या आगमनाची चाहूल लागली. २२ सप्टेंबर १८८७ या शुभ दिवशी गंगाबाईच्या पोटी भाऊरावांचा जन्म झाला. पाटलांच्या घरी पुत्र झाला म्हणून सर्व गावालाच आनंद झाला.
हे बालक आजोळी कुंभोज या गावी जन्माला आले होते. बारशाचा दिवस उजाडला. बाया-बापड्या जमल्या आणि नाव ठेवले ‘भाऊ ‘. त्या बिचार्या आयाबायांना कल्पना नसेल कि, हाच भाऊ पुढे महाराष्ट्रातील जनतेचा खराखुरा ‘भाऊ’ होणार आहे.
मनाची मशागत
भाऊराव हळूहळू मोठे होऊ लागले.तशा त्यांच्या खोड्या वाढू लागल्या गावाची शीव ओलांडून ते नदीपर्यंत फिरू लागले. त्यांच्याभोवती मोठा मित्रमेळा जमू लागला. सकाळी लवकर उठावे. थोडे इकडे तिकडे केल्यावर सखे सोबती जमवावे, तर्हे तऱ्हे चे खेळ खेळावे, वारणा नदीत डुंबावे. वनराजीतून फेरफटका मारावा असे स्वछंद जीवन भाऊराव जगत होते. मुलांचे पुढारीपण त्यांच्याकडे चालून आले. भावी जीवनातील पुढारीपण धडे भाऊराव येथेच गिरवू लागले.
त्यांचे बाहू बळकट झाले. पाय आणि मन खंबीर होऊ लागले. अशा शक्तीच्या जोरावरच भाऊरावांना पुढील आयुष्यातील अफाट कार्य करता आले. त्यांच्या मनावर येथे दुसराही संस्कार याच वयात झाला. अन्यायाविरुद्ध ते पेटून उठायचे. समाजकंटकांचा कर्दनकाळ आणि गोरगरीब जनतेचा कैवारी, अशा सत्या नावाच्या बंडखोर माणसाच्या सहवासात भाऊरावांचे बालपण गेले. त्यामुळे भाऊरावांचे विचारही तसेच बंडखोर झाले. पुढील आयुष्यात त्यांनी समाजातील अनिष्ट, क्रूर रूढींविरुद्ध बंड केले. त्याची बीजे याच काळात भाऊरावांच्या मनात रुजली होती. बाल भाऊरावांना वडिलांच्या घराण्याकडून औदार्य, त्याग आणि समता या गुणांचा अमूल्य ठेवा मिळाला. तर आईच्या घराण्याकडून दुष्टांचा नाश, अन्यायाचा प्रतिकार आणि दीन – दुबळ्यांचा कैवारी या गोष्टीचे पाठबळ प्राप्त झाले. बंडखोरी आणि साधुत्व या गुणांचा सुरेख संगम भाऊरावांच्या जीवनात झालेला पाहावयास मिळतो. मामाचे गाव सोडून भाऊराव नंतर वडिलांच्या गावी आले.पिळदार शरीर, खंबीर मन आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा तेजस्वी बाणा घेऊन भाऊराव वडिलांकडे राहावयास आले. त्यांचे वडील सरकारी खात्यात काम करायचे. त्यांची वारंवार बदली व्हायची. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर व्हायचा. त्याकाळी आजच्यासारख्या शाळा नसायच्या. शाळेसाठी खूप दूर जावे लागायचे. काही मुलांना तर तेही शक्य नसायचे. त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना शाळेचे तोंडसुद्धा पाहता यायचे नाही.
जी मुले दूरच्या गावी राहून शिकत, त्यांनाही लवकरच गरिबीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून घरचा रस्ता धरावा लागे२ अशा स्थितीत भाऊरावांच्या शिक्षणाची तशी हेळसांड झाली. भाऊरावांचे वडील जागरूक स्वभावाचे होते. शिक्षणाचे महत्व त्यांनी ओळखले होते. आपल्या मुलांनी खूप शिकावे, असे त्यांना वाटत असे. त्यांनी इंग्रजी शिकून पदव्या मिळवाव्या असेही त्यांना वाटे. भाऊराव सर्व भावंडात मोठे. त्यांच्या आई गंगाबाई याही मुलांच्या शिक्षणाबाबत जागरूक होत्या. पतीची फिरतीची नोकरी असल्यामुळे मुलांच्या देखभालीची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली होती. चार भिंतीच्या शाळेत रमण्यापेक्षा भाऊराव निसर्गाच्या शाळेतच रमायचे. मित्रांच्या सहवासात रानावनात हिंडायला त्यांना खूप आवडायचे. शाळेत हजेरी लावल्यानंतर त्यांचा ओढा खेळण्याकडे असायचा.
बंडखोर विचार
कोल्हापूर एक पवित्र तीर्थक्षेत्र तर होतेच, पण आधुनिक शिक्षणाची पवित्र गंगाही येथून वाहात होती. इतर ठिकाणी फारशी नसली तरी, कोल्हापुरात मात्र बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे उघडू लागली होती. भाऊराव आणि त्यांचे बंधू असे दोघेही शिक्षणासाठी कोल्हापूरला आले होते. शाहू महाराजांनी सहाय्य्य केलेल्या अशाच एका वसतिगृहात भाऊराव राहू लागले. भाऊराव ज्या वसतिगृहात राहत होते, ते वसतिगृह चालवणारी मंडळी जुन्या कर्मठ विचारांची होती. आधुनिक विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना जाचक ठरतील असे निर्बंध त्या ठिकाणी होते. अशा जाचक निर्बंधाविरुद्ध भाऊरावांना सुरुवातीलाच लढावे लागले. दलित मित्रांच्या सहवासात वावरणारे भाऊराव अशा अनिष्ट रूढी- परंपराना भीक घालणारे नव्हते. सडेतोड, सरळ स्वभावाचे, खंबीर मनाचे भाऊराव आपोआपच विद्यार्थ्यांचे नेते बनले. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असत. अशा व्यापात गुंतल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन ते पडत असत. भाऊराव इंग्रजी शाळेत होते, त्यावेळी बहुजन समाजातील कर्मठ विचारांच्या लोकांचे वर्चस्व होते. बहुजन समाज असाच अडाणी, दरिद्री राहावा असेच त्यांचे प्रयत्न होते.
सत्य शोधक चळवळीतर्फे कोल्हापुरात अनेक विद्वानांची भाषणे व्हायची. त्यांनी सुरु केलेली पुस्तके विद्यार्थ्यांच्या वाचनात येत असत. महात्मा फुल्यांच्या क्रांतिकारक विचारांनी भाऊराव तर भारावून गेले होते. त्यांची अनेक पुस्तके भाऊरावांनी वाचून काढली. त्या पुस्तकातील शिकवणुकीने भाऊरावांच्या बंडखोर विचारसरणीला खत-पाणी घालण्याचे काम केले. भाऊराव सभोवती, आजूबाजूला पाहू लागले. काय दिसले त्यांना ? गरीब बहुजन समाज कर्मठ विचारांच्या लोकांच्या वेढ्यात गुरफटला होता. असे लोक आपल्या आचरणाने बहुजन समाजाचे शोषण करीत होते. सर्व समाज क्रूर रूढी परंपरांनी आतून पोखरला, किडला होता.
एकदा भाऊराव दलित बांधवांच्या वसतिगृहाच्या उदघाटन समारंभाला हजर राहिले, त्यात भाग घेतला, म्हणून वसतिगृहाच्या कर्मठ अधिकाऱ्यांनी त्यांचे जेवण बंद केले. स्नान करून, शुद्ध होऊन ये, म्हणजे तुला जेवण मिळेल असे त्यांना सांगण्यात आले. परंतु असे विचार भाऊरावांना मान्य होण्यासारखे नव्हते. अशा माणुसकीशून्य अनिष्ट रुढीची बंधने तोडलीच पाहिजेत, असे
त्यांनी ठरविले. “मी अनिष्ट रूढी-परंपरा पाळणार नाही. दलित बांधव हि सुद्धा माणसेच आहेत.त्यांना माणुसकीशून्य वागणूक देणे मला कधीच पटणार नाही” असे भाऊरावांनी खणखणीतपणे सांगितले. अनायाविरुद्ध झगडण्याचे अनेक प्रसंग विद्यार्थी दशेतच भाऊरावांवर आले होते. अधिकारी वर्ग नेहमी नियम मोडीत असत, पण विद्यार्थ्यांनी चुकून जरी असा नियम भंग केला तर त्याला दंड भरावा लागत असे.
भाऊरावांनी असाच एकदा दंड भरण्यास नकार दिला. ते गरजले,”कर्मठ लोकांना खुश ठेवण्यासाठीच असे नियम केले आहेत, नियम मोडून मी कोणताही अधर्म केला नाही. अधिकाऱ्यांनी नियम मोडला तर चालतो, मात्र विद्यार्थ्यांनी मोडला तर ते पाप, हे कोणत्या पुस्तकात सांगितले आहे?” भाऊरावांच्या अशा उत्तराने त्या अधिकाऱ्यांचा अहंकार जागा झाला. परंतु भाऊरावांनी दंड न भरता बाड- बिस्तारा उचलला आणि सरळ वसतिगृह बाहेरचा रस्ता धरून जुनाट विचारांना आणि आचारांना सडेतोड उत्तर दिले.
ध्येयाचा प्रारंभ
भाऊराव पुस्तकी शिक्षण घेत असले तरी, त्यांनी दुसऱ्याही एका अभ्यासाला प्रारंभ केला होता. विद्यार्थी दशेतील वयातच अन्याय रूढी आणि क्रूर धर्मसमजुती यांच्या विरुद्ध झगडून त्यांनी सामाजिक अभ्यासाला शाळेतच सुरुवात केली होती. पैलवानकी करण्याबरोबरच भाऊराव शिक्षणही घेत होते. परंतु शिक्षणापेक्षा सामाजिक कार्याकडेच त्यांचे मन अधिक ओढ घेत होते.त्यांनी मग इंग्रजी सहावीत असतानाच शाळेला रामराम ठोकला.आपल्या मुलाने निदान दहावी मॅट्रिक पर्यंत शिकावे, असे भाऊरावांच्या वडिलांना वाटत होते, परंतु भाऊरावांनी मध्येच शिक्षण सोडल्यामुळे त्यांना वाईट वाटले. भाऊराव मग मुंबईला गेले. पण मुंबईचा झगमगाट पाहून त्यांचे मन तेथे रमले नाही. मुंबई सोडून ते साताऱ्याला आले. साताऱ्याला त्यांनी एक खाजगी शिकवणी वर्ग सुरु केला. विद्यार्थी दशेत शेवटच्या बाकावर उभे राहून शिक्षा भोगणारे भाऊराव, आता ” भाऊराव, पाटील मास्तर ” म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्याकडे येणारे विद्यार्थी बहुतकरून दलित समाजातील होते. त्यातील काही मुलांना ते पुस्तके, कपडेसुद्धा पुरवायचे. अनेकांना मोफत शिकवायचे.
महाडिक नावाच्या शिक्षण प्रेमी समाजसेवकांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी साताऱ्याला ‘मराठा विद्यप्रसारक समाज ‘ हि संस्था स्थापन केली. या कामी त्यांना भाऊरावांची खूप मदत झाली. अशा कार्यामधून त्यांना सामाजिक कार्य करण्याची स्फूर्ती मिळत होती. अनेकांशी ओळखी होत होत्या. अशा समाज कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी सातारा जिल्ह्यातील दुधगाव येथे एक शिक्षण संस्था स्थापन केली.अनेक विद्यार्थी तेथे शिक्षण घेऊ लागले. तेथे सर्वाना प्रवेश खुला होता. मुलांसाठी त्यानी एक वसतिगृह सुरु केले. संस्थेचा विस्तार वाढू लागला. भाऊराव विद्यादानाचे पवित्र कार्य करू लागले.
राज द्रोहाचा खोटा आळ
इंग्रज सरकारने दडपशाही करून जनतेचे राजकीय हक्क हिरावून घेतले होते त्यामुळे हिंदी तरुणांची माथी भडकली होती. क्रांतिकारी विचारांचे तरुण बॉम्बस्फोट करून संताप व्यक्त करीत होते. जनताही इंग्रज सरकारविरुद्ध संताप व्यक्त करीत होती.
अशा वातावरणात कोल्हापुरात डांबर प्रकरण उद्भवले. टॉऊन हॉलजवळील बागेत असलेल्या इंग्रज राणीच्या पुतळ्याला कोणीतरी डांबर फासले. संबंध कोल्हापुरात खळबळ उडाली. समाजकार्य करणाऱ्या तरुणांकडे पोलिस संशयाने पाहू लागले. या संधीचा फायदा काही दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांनी करून घ्यायचे ठरवले. स्वार्थी आणि अधम स्वाभावाचे लोक, किती खालच्या पातळीवर जातात, याचे हे प्रकरण म्हणजे उत्तम उदाहरणच होते. चोराला सोडून संन्याशालाच सुळी द्यावे. तसाच हा प्रकार होता. हे प्रकरण घडले त्यावेळी भाऊराव आपल्या वडिलांकडे कारगावला होते. त्यांना अचानक एका मोठ्या माणसाने तार करून कोल्हापुरात बोलावून घेतले. त्यांच्याशी गोड -गोड बोलून, एका चांगल्या माणसाविरुद्ध कोर्टात खोटी साक्ष देण्यासाठी त्यांना फितवण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु भाऊरावांना अशी खोटी साक्ष देऊन, एखाद्याचे आयुष्य बरबाद करायचे नव्हते. त्यांनी अशी खोटी साक्ष देण्यास विरोध केला. मग काय? त्या गृहस्थांनी भाऊराव ऐकत नाही. खोटी साक्ष देण्यास कबूल होत नाही, हे पाहून
त्यांनाच अद्दल घडवण्याचे मनाशी ठरवले गृहस्थांनी स्वतः च घरातील कागदपत्रे जाळले, आग लावणे आणि चोरी करणे असे आरोप ठेऊन भाऊरावांनाच पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. न केलेला गुन्हा काबुल करण्यासाठी त्यांच्यावर पोलिसानी खूप अत्याचार केले. नानाप्रकारे त्रास दिला. मात्र, प्राणत्याग करिन,पण खोटे बोलणार नाही, असे भाऊरावांनी निक्षून सांगितले. भाऊरावांना राजद्रोहाच्या आरोपात अडकवण्यासाठी नवे प्रयोग करायला सुरुवात केली. खोटे साक्षी पुरावे करायलाही सुरुवात केली. परंतु अनेक लोक भाऊरावांना ओळखत होते. त्यांची ध्येय निष्ठा,त्यांचे समाजकार्य लोकांनी पहिले होते. अशा भाऊरावांची मान फासात अडकवण्यासाठी कोण पुढे येणार? पोलीस तोंडघशी पडू लागले. शाहू महाराजांनी खोलवर चौकशी करून खरा प्रकार जाणून घेतला, त्यांनी हि हकीकत इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली. त्यानंतर भाऊरावांची बिनशर्त सुटका होऊन, त्यांच्यावरील राजद्रोहाचा खोटा आरोप धुतला गेला. त्यांचे चरित्र उजळून निघाले.
शिक्षण प्रसार हेच ध्येय
एका अग्निदिव्यातून भाऊराव पार पडले. आपल्यावरील अत्याचाराची आठवण होऊन भाऊरावांच्याही अंगावर काटा येत होता. मौज मजा करण्याच्या वयात त्यांनी अमानुष छळ सोसला होता. ज्यांच्या वाट्याला अशा यमयातना येतात, ते लोक पुन्हा समाजकार्याकडे वळतानादहावेळा विचार करतात.तर कोणी कायमचेच समाजकार्य सोडून देतात. तरीसुद्धा मोठ्या संकटातून मार्ग काढीत भाऊरावांनी आपली जीवन नौका समाज सेवेच्या महासागरात आणून उभी केली. जिकडे पाहावे तिकडे पाणी,तसे समाज जीवनात पाहावे तिकडे अज्ञान,दारिद्र्य,निरक्षरत,दुष्ट रूढी आणि अमानुषता.बहुजन समाजाची ती दैन्यावस्था पाहून भाऊराव आपले दुःख विसरले. अडाणी, निरक्षर समाजाला शिक्षणाचे अमृत पाजल्याशिवाय समाजाची सुधारणा होणार नाही, हे त्यांनी जाणले, जीवनाचा महासागर तरून जायचे असेल तर,शिक्षणाशिवाय उपाय नाही याची त्यांना जाणीव झाली.
मग ठरले तर,शिक्षणाची आधुनिक गंगा बहुजन समाजाच्या दारापर्यंतपोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी,पर्वा करायची नाही. असे मनाशी ठरवून भाऊरावांची जीवननौका समाजसेवेकडे वळली. आपले उरलेले जीवन समज कार्यासाठी खर्च करण्याचे त्यांनी ठरवले.
मजुरांचे हितकर्ते
ओगले यांनी कराड जवळ काच कारखाना उभारला होता. त्यांना व्यवसायात मदत करण्याचे भाऊरावांनी ठरवले कारखान्यातून माल बाहेर पडू लागला. भाऊरावांनी गावोगावी हिंडून स्वदेशी मालाचा प्रचार केला. परदेशी वस्तूंकडे लोकांनी पाठ फिरवली. भाऊरावांनी ओगल्यांच्या कारखान्याची लाखो रुपयांची विक्री करून दिली. भाऊरावांच्या या कार्यकुशलतेकडे आणखी काही कारखानदारांचे लक्ष वेधले. भाऊरावांनी त्यांच्याही कारखाण्यास मदत केली. हे काम करीत असताना मजुरांच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष गेले. मजुरांच्या हिताकडे मालकाचे दुर्लक्ष होत होते. मजुरांना अल्प वेतनावर काम करावे लागत होते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होत होती. मालक मजुरांचे शोषण करीत असलेले पाहून भाऊरावांना दुःख होत होते. मजुरांना वेतन वाढ मिळाली पाहिजे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कारखान्याचे काही सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत,असे त्यांना वाटत असे. त्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रयत्न केले. सभा संमेलन भरवून मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा भाऊरावांनी प्रयत्न केला
समाजरूपी जमिनीची मशागत
चांगले पीक येण्यासाठी जमिनीची भरपूर मशागत करावी लागते. भाऊरावांच्या मनातही हाच विचार आला. शिक्षणाचे रोपटे लावण्यापूर्वी जनतेच्या मनाची मशागत करायला हवी. शिक्षणाचे महत्व त्यांना पटवून द्यायला हवे. त्यांचे अज्ञान दूर करायला हवे, तरच आपले शिक्षणाचे रोपटे तग धरेल याची जाणीव त्यांना झाली. रूढी ग्रस्त समाजाच्या मनातील अज्ञानाची जळमटे काढल्याशिवाय नवे विचार समाजाच्या पचनी पडणार नाहीत, असे भाऊरावांना दिसून आले. कारण समाजाची अवस्था होतीच तशी. लोकांची करमणूक करून त्याद्वारे सत्यशोधक चळवळीचा प्रचार करणाऱ्या पथकाला ‘जलसपथक ‘असे म्हणतात.सातारा भागातही अशा पथकाद्वारे जनजागृतीचे कार्य सुरु होते. गावोगावी जलशाचे कार्यक्रम होत. मनोरंजन,लोकहित आणि त्याचबरोबर राष्ट्रहित साधण्याचा हा त्रिसूत्री कार्यक्रम होता. आपल्या भाऊरावांनीहि समाज जागृत करण्यासाठी सातारा भागात असे चार-पाच जलसे काढले होते.
अशा जलशाद्वारे समाज प्रबोधन करीत असता,भाऊराव कोणाची निंदा नालस्ती करीत नसत. अशा कार्यक्रमाला गरीब,अशिक्षित लोक गर्दी करत असत. जलशाचा कार्यक्रम संपता संपता भाऊराव सडेतोड भाषण द्यायचे.स्पुर्थीदायक विचार मांडायचे.त्यामुळे समाजाचे डोळे उघडू लागले. लोक भाऊरावांना चांगले ओळखू लागले. अनेक गावात सभा,संमेलने,जत्रा, यात्रा, परिषद, जलसे याद्वारे ते जनतेचे खरे-खुरे नेते बनले. अन्याय दूर करणे हाच त्यांचा धर्म बनला.
अशा प्रकारे भाऊराव समाजात शिक्षणाचे रोपटे लावण्यापूर्वी समाजरूपी जमिनीची खोलवर मशागत करीत होते.
खादीचा स्वीकार
समाजात खोलवर रुजलेली अनिष्ट रूढी-परंपरेची पाळेमुळे खणून काढणे हि सोपी गोष्ट नव्हती. ज्या विचारवंतांनी,समाजसुधारकांनी असा प्रयत्न केला त्यातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.भाऊरावांनी शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली, त्यावेळी देशभर स्वातंत्र्य चळवळ जोमाने सुरु होती. सभा, मोर्चा, हरताळ पाळून हिंदी जनता इंग्रज सरकारचा निषेध करू लागली होती. मुंबईला अशीच एक मोठी सभा भरली होती. स्वातंत्र्यासाठी ज्यांची मने पेटून उठली होती, असे हजारो तरुण सभेला हजर होते. आपले भाऊराव सुद्धा झकपक पोशाख करून सभेला आले होते. व्यासपीठावर गांधीजींचे भाषण सुरु झाले. केवळ पंचा नेसलेल्या गांधीजींना पाहताच,त्यांचे देशप्रेमाने भरलेले भाषण ऐकताच,त्यांची स्वातंत्र्याची तळमळ पाहताच झकपक पोषाखातल्या भाऊरावांना आपल्या अंगावरील भारी कपडे कसेसेच वाटले.
ते तडक बाहेर पडले. धोतर,सदरा आणि टोपी हि खादीची वस्त्रे विकत घेऊन त्यांनी अंगावर चढवली. आपल्या अंगावरील परदेशी वस्त्रे त्यांनी नुकत्याच पेटवलेल्या परदेशी कपड्यांच्या होळीला अर्पण केली.’आजपासून विदेशी कपडे वापरायचे नाहीत, साधी राहणी ठेवायची ‘ अशी प्रतिज्ञा केली.
भाऊराव आयुष्यभर या व्रताला जागले.ते नेहमी हातसुताचें कपडे वापरू लागले.पुढे त्यांनी पादत्राणे आणि टोपीचाही त्याग केला. ते कोठेही अनवाणी पायानीच हिंडू-फिरू लागले. आपल्या प्रतिज्ञेचा भंग होईल, असे ते कधीच वागले नाहीत. अशा प्रकारे खादीचा स्वीकार करून भाऊराव पुढील कार्याला लागले
रयत शिक्षण संस्था
बहुजनांची सेवा करणे हेच भाऊरावांचे ध्येय होते. खादीचा स्वीकार केल्यावर ते देशसेवेच्या कार्यात गढून गेले. काँग्रेस चे राष्ट्रसेवेचे विचार खेड्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते जनजागृतीचे कार्य सुरू करू लागले. राष्ट्रीय चळवळीत भाग घ्यायला त्यांनी सुरुवात केली. खेडोपाडी त्यांचे दौरे आणि व्याख्याने सुरु झाली. भाऊराव आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्रभर रान पेटवू लागले. त्यांनी देशसेवेचे विचार थोडक्याच काळात शेतकरी आणि कामगारापर्यंत पोहोचविले. भाऊराव असे जनजागृतीचे कार्य करीत असता, त्यावेळच्या सरकारने एक शेतकरीविरोधी कायदा केला. भाऊरावांनी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणे या कायद्याला विरोध करायचे ठरवले. शेतकऱ्यांशी बोलून, चर्चा करून त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र केले. शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. शेतकऱ्यांची ती ताकद पाहून सरकारने माघार घेतली अशा प्रकारे सरकारच्या विरोधात भाऊरावांनी केवढी प्रचंड शक्ती निर्माण केली असेल, त्याची कल्पना येते.भाऊरावांनी दुधगाव येथे शैक्षणिक कार्य सुरु केले होते. परंतु मध्येच संकट आल्यामुळे ते त्यांना अर्धवट सोडून दयावे लागले होते. सत्यशोधक चळवळीचे अधिवेशन सातारा जिल्ह्यातील कार्ले या गावी भरले होते. मोठा पुढारी मंडळी, मोठा जनसागर या सभेला हजर होता. याच सभेत सर्व विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश असणारे वसतिगृह उघडण्याचे भाऊरावांनी जाहीर केले. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी लगोलग कार्ले येथे वसतिगृहाची स्थापना केली. अशा प्रकारची वसतिगृहे इतर अनेक ठिकाणी स्थापन करण्यासाठी एक संस्था स्थापन करण्यात आली. तीच आजची सुप्रसिद्ध “रयत शिक्षण संस्था” होय.
या संस्थेचा विस्तार वेगाने वाढू लागला. म्हणून सातारा या मध्यवर्ती ठिकाणी त्यांनी आपल्या संस्थेचा संसार थाटला. एका दलिताच्या मुलाला घेऊन त्यांनी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचे बीज पेरले. त्या दिवसापासून त्यांच्या खऱ्या कार्याला सुरुवात झाली. गांधीजींच्या हस्ते संस्थेचा नामकरण समारंभ पार पडला. भाऊरावांनी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य जवळून पहिले होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेतली म्हणूनच त्यांनी आपल्या पहिल्या वस्तिगृहचे नाव:छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस “असे ठेवले. भाऊरावांचा हा शैक्षिणक वटवृक्ष महाराष्ट्रभर पसरला. त्यांनी सुरु केलेल्या शैक्षणिक संस्था आपल्या पायावर उभ्या राहून जोमाने शैक्षणिक कार्य करू लागले.
शैक्षणिक कार्य करीत असतानाही भाऊरावांचा बंडखोर स्वभाव उफाळून येत असे. गांधीजींनी सुरु केलेल्या कायदेभंग आंदोलनात भाऊराव भाग घेऊ लागले. सत्याग्रह,प्रभात फेरी, भाषणे यांनी सातारा परिसर दुमदुमून गेला. एके ठिकाणी भाऊराव कायदेभंग करणार हि बातमी समजताच, भाऊरावांना कसे आवरावे, हा प्रश्न इंग्रज पोलिसानं पडला. पोलिसांची धावपळ सुरु झाली. गरज पडल्यास लष्कराला बोलावण्याचे आदेश सुटले. भाऊरावांचे भाषण म्हटल्यावर हजारो शेतकरी बांधव सभास्थानी जमले. भाऊरावांना पकडून तुरुंगात टाकले तर, वस्तीगृहातल्या मुलांचे काय हि काळजी भाऊरावांच्या पत्नीला पडली.
भाऊराव सभास्थानी आले.त्यांच्या मुखातून देशभक्तीच्या शब्दाचे बाण सुटू लागले. त्यांचे भाषण रंगात आले. त्यांच्या विचारांचे स्वागत करायला वरुणराजाने जलधारांचा वर्षाव सुरु केला. धुवाधार पावसातही हजारो लोक भाऊरावांचे विचार ऐकत होते. पोलीस भाऊरावांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. वरून राजाने त्यांचा रस्ता अडवून धरला होता. भाऊरावांना पकडण्याची दुर्बुद्धी पोलिसाना झाली नाही. भाऊराव सही सलामत घरी आलेले पाहून लक्ष्मीबाईंना खूप आनंद झाला.
भाऊराव कर्मवीर भाऊराव पाटील झाले
भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई भाऊरावांच्या पाठीशी पहाडाप्रमाणे उभ्या राहिल्या. त्यांना आधार दिला. भाऊरावांना बहुजनांना शिक्षण देण्यासाठी वटवृक्षासारखा संस्थेचा प्रसार फुलवला. परंतु त्याची देखभाल , संगोपन लक्ष्मीबाई नि केले. सुरुवातीला एवढ्या मुलांच्या खाण्या पिण्याची, त्यांच्या संगोपनाची व्यवस्था लक्ष्मीबाईंनाच पाहावी लागत होती. त्यांनी कधी कुरकुर केली नाही. एवढ्या मुलांसाठी अन्न शिजवणे, भाऊराव दौऱ्यावर गेल्यावर सर्व व्यवस्था पाहणे, हि कामे त्यांनाच करावी लागत. संस्था हेच त्यांचे घर झाले. अडीअडचणीतून त्यांनाच मार्ग शोधावा लागत असे.
एकदा अशीच त्यांची परीक्षा पाहणारी वेळ आली. तो सणाचा दिवस होता. भाऊराव दौऱ्यावर गेलेले. वसतिगृहात तर धान्याचा कण नाही. कोणाजवळ रुपयासुद्धा नाही. प्रसंग कठीण. काय करावे, कोणालाच समजेना. माझी पोरं सणाच्या दिवशी उपाशी राहणार या कल्पनेने लक्ष्मीबाई कासावीस झाल्या. ऐनवेळी कोण मदत करणार?तेवढ्यात त्यांचा हात आपल्या सौभाग्य अलंकाराकडे गेला. त्यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढले. ते विकून येणाऱ्या पैशातून मुलांसाठी धान्य आणण्यास सांगितले. पण सौभाग्यचे लेणे कोणी विकायला धजावेना. तेंव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या,” सत्कार्यासाठी कोणतीही गोष्ट अशुभ नसते “अशा प्रकारे समजूत काढल्यावर तो दागिना गहाण ठेवला. त्यातुन आलेल्या पैशातून वाणसामान खरेदी केले. ऐन सणाच्या दिवशी लक्ष्मीबाईंनी आपल्या वसतिगृहातील मुलांना अन्नाचा गोड घास भरवला . अशाप्रकारे अनेक अडचणींना तोंड देत, भाऊराव रात्रदिवस राबत होते.
बहुजन समाजातील सर्व मुलांना एकत्र आणून त्यांनी मानवता धर्माचे शिक्षण दिले. मानपानाची, सत्तेची अपेक्षा न धरता दरिद्री-नारायणाची सेवा केली. आपल्या चाळीस वर्षाच्या अखंड तपश्चर्येचे बळावर एवढे मोठे कार्य केल्यामुळे त्यांच्या कार्याचा, कीर्तीचा सुगंध सर्वदूर पसरला. लोक त्यांना प्रेमाने ‘कर्मवीर अण्णा ‘ असे म्हणू लागले. देशानेही त्यांना’पदमभूषण ‘ असा ‘किताब देऊन त्यांचा सम्मान केला. पुणे विद्यापीठाने डॉक्टरेट हि सन्माननीय पदवी देऊन गौरव केला.
अखंड परिश्रम,सतत धावपळ याचा परिणाम त्यांच्या देहावर होऊ लागला होताच. ज्या वयात विश्रांती घ्यायची त्या वयात त्यांच्या कार्याचा व्याप प्रचंड वाढला होता. तरुणानं लाजवेल अशा तडफेने ते कार्य पार पाडीत होते. परंतु काळापुढे सर्व नाच शरणागती पत्करावी लागते.भाऊरावांचे मन थकले नव्हते तरी शरीर थकले होते. अखेर ९ मे १९५९ या दिवशी कर्मवीरांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.
या महापुरुषाचे हे मानवतेचे कार्य महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. त्यांच्या स्मृतीला आमचे शतशः अभिवादन.
हे पण वाचा :-अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र
हे पण वाचा :- झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवनचरित्र